वार्ताहर / हणमंतवाडी (करवीर)
करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथे रंगपंचमी खेळून आंघोळीसाठी क्रशर खणीत गेलेल्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला. यशराज राजू माळी असे मृत मुलाचे नाव असून तो इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होता. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास यशराजसह मारुती कस्तुरे आणि अभिषेक खेतल हे मित्रही आंघोळीला गेले होते. मात्र, यशराज आणि मारुती यांना पोहायला येत नव्हते. चेष्टा सुरू असतानाच ते पाण्यात बुडू लागले. अभिषेकने मारुतीला वाचवून काठावर आणले. मात्र, यशराजचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान, मारुती व यशराजला पोहायला येत नसताना एकमेकांची पाण्यात चेष्टा करण्याच्या नादात दोघेही पाण्यात खोलवर चालले. यावेळी यशराज पाण्यात गटांगळ्या खात असल्याचे अभिषेकच्या लक्षात आल्याने त्याने पाण्यात उडी मारली. पण त्याच्या पायाला यशराजने मिठी मारल्याने त्याच्यासोबत तोही बुडत होता. यावेळी अभिषेकने पायाला हिसडा देऊन मारुतीला घेऊन तो काठावर आला. त्यामुळे मारुतीचे प्राण वाचले. मारुती कस्तुरे ला खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मृत यशराजच्या वडिलांचे तीन वर्षांपूर्वीच निधन झाले असून त्याच्या दोन बहिणी विवाहित आहेत. माळी कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील नीरा येथील आहे. तर सध्या त्याची आई ताराबाई रोडवर भाजी विक्री करून उदरनिर्वाह करते. सदर घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे.