केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांचे विधान
पंजाब विधानसभा निवडणुकीनंतर शिरोमणी अकाली दलासाब्sात भाजप पुन्हा आघाडी करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. परंतु केंद्रीय शहरविकास मंत्री हरदीप पुरी यांनी चर्चेला विराम दिला आहे. आता ही आघाडी कुठल्याही किमतीवर शक्य नाही. शिरोमणी अकाली दलाने इच्छा व्यक्त केली तरीही ही आघाडी होणार नाही. कारण आघाडीमुळे भाजपला मोठे नुकसान झाले असल्याचे पुरी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक घडल्यावर चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्रिपदावर कायम राहण्याचा कुठलाच अधिकार नाही. पंतप्रधानांचा ताफा रोखण्यात आला त्या ठिकाणी पोलिसांना केवळ 15 मिनिटांमध्ये कोंडी दूर करता आली असती. परंतु पंतप्रधानांच्या सभेला रोखण्यासाठी हे सर्व करण्यात आले होते असा आरोप पुरी यांनी केला आहे.
पंजाबवर 2.81 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. राज्यात पुन्हा चुकीचे सरकार आल्यास कुणीच गुंतवणूक करणार नाही. भाजप सत्तेवर आल्यास श्वेतपत्रिका प्रसिद्ध करणार आहे. मुख्यमंत्री चन्नी यांच्या मतदारसंघातच मोठय़ा प्रमाणावर वाळूचा अवैध उपसा होतो. निवडणूक आली म्हणून तपास यंत्रणांना चौकशी बंद करता येत नसल्याचे पुरी यांनी नमूद केले आहे.
मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचे वाळूमाफियांशी संबंध आहेत. चन्नी यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्यापूर्वी काँग्रेसने याचा अवश्य विचार करावा. पहिल्यांदाच सरकार स्थापन करण्याची शक्यता असलेल्या राज्यात मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित न करण्याची भाजपची परंपरा राहिली आहे. पंजाबच्या गावांमध्ये भाजप उमेदवाराला प्रवेश करू दिला जाणार नसल्याची कल्पना केली जात होती असे पंजाबमधील भाजप प्रभारी आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री चन्नी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांच्या गृहयुद्धामुळे पंजाबला नुकसान झेलावे लागले आहे. चन्नी सरकारमध्ये प्रत्येक गोष्टीची एक किंमत निश्चित असल्याचा आरोप भाजप नेते सुभाष शर्मा यांनी केला आहे.