माध्यमिक, उच्चमाध्यमिक शाळांतील कर्मचाऱयांच्या चाचण्याचे नियोजन
प्रतिनिधी/ रत्नागिरी
तालुकानिहाय शिक्षकांची आरटी-पीसीआर तपासणी आरोग्य विभागामार्फत मोफत करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. गेले आठ महिने कोरोना महामारीमुळे शाळा बंद होत्या. ऑनलाईन शिक्षण सुरू होते. 23 नोव्हेंबरपासून नववी ते ते बारावी वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक, कर्मचाऱयांनी कोरोना चाचणीचे नियोजन आरोग्य विभाग व शिक्षण विभागाने संयुक्तपणे केले आहे. त्यानुसार तालुकानिहाय 19 नोव्हेंबरपासून शिक्षक, कर्मचाऱयांची मोफत तपासणी सुरू केली आहे.
शासनाच्या नियमांचे पालन जिल्हयातील सर्व शाळा करणार आहेत. दिवाळी सुट्टी 20 नोव्हेंबरपर्यंत आहे, तत्पूर्वी सर्व कर्मचाऱयांना कोरोना टेस्ट करून घ्यावी व 21 नोव्हेंबरला कर्मचारी शाळेत हजर झाल्यानंतर 23 नोव्हेंबरपासून शाळेत विद्यार्थी दाखल होतील. पाल्यांना शाळेत पाठवण्याची पालकांवर सक्ती केली जाणार नाही. पालकांच्या लेखी संमत्तीनेच मुले शाळेत येतील. शाळेमध्ये सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटायझेशन आदीबाबत मार्गदर्शक सूत्रे देण्यात आली आहेत. या सूत्रांनुसार शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने शाळांनी नियोजन सुरू केले आहे. मुलांच्या वाहतूक व्यवस्थेबाबतही नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे.
निर्णय झाला पण…?
शाळांना 20 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी आहे. त्यामुळे काही शिक्षक गावाला गेलेले आहेत. कोविड चाचणीचे काम 19 तारखेपासून सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे गावाहून 20 किंवा 21 तारखेला परतणाऱया कर्मचाऱयांच्या चाचणीचे काय, हा प्रश्न अनुत्तरीतच ठेवण्यात आला आहे. शिक्षक व कर्मचाऱयांची कोविड चाचणी होणार परंतु कितीतरी मोठय़ा संख्येने शाळेत येणाऱया विद्यार्थ्यांच्या चाचणीबाबत कोणताही खुलासा शासकीय निर्देशात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. शासननिर्णयातील अनेक मुद्दे संभ्रम व प्रश्न निर्माण करणारे आहेत मात्र त्याबद्दल स्पष्टीकरण दिले जात नसल्याचे शाळांचे म्हणणे आहे.
– शाळांसमोरील प्रमुख प्रश्न
1) शाळांच्या सॅनिटायझेशनची यंत्रणा कशी उभारावी
2) प्रे-पंप, फवारणीची रसायने, थर्मल गन्स, ऑक्सीमीटर यासाठी येणाऱया खर्चाची तरतूद कशी करणार
3) विद्यार्थ्यांच्या कोविड चाचणीबाबत शासन कोणता निर्णय घेणार
4) फारच कमी पालकांनी मुलांना शाळेत पाठवले तर अभ्यासक्रमाचे नियोजन कसे करणार
5) 11वीची प्रवेश प्रक्रियाच अपूर्ण असताना ते वर्ग कसे सुरु करणार
6) केवळ इंग्रजी, गणित व विज्ञान विषय प्रत्यक्ष शिकवण्याच्या सूचनेची कला, वाणिज्य शाखेत अंमलबजावणी कशी करणार
7) शास्त्र शाखेला सर्वच विषयांचे अध्यापन कसे करणार
8) मोठी विद्यार्थी संख्या असणाऱया शाळांमध्ये तुकडय़ांचे व वेळापत्रकाचे नियोजन कसे करणार
9) शिक्षकांनी 3-4 तास मास्क लावून अध्यापन करणे शक्य आहे का व आरोग्यदृष्टय़ा योग्य आहे का
10) शाळांचे सातत्याने निर्जंतुकीकरण करण्यासाठी मनुष्यबळ व साधने कशी उभी करणार