प्रतिनिधी / सातारा
शिक्षण क्षेत्रातील कंत्राटी, विना अनुदानित, विना वेतन, अर्धवेळ, कमी वेतन हे शब्द मला हद्दपार करायचे आहेत. नियीमत वेतन हा शिक्षकांचा हक्क आहे. जुनी निवृत्ती वेतन योजना पुन्हा लागू करणे, अनुकंप तत्वावरील भरती प्रक्रिया वेळोवेळी झाली पाहिजे, विद्यार्थ्यांना वेळीच शिष्यवृत्ती, फी मिळाली पाहिजे. शिक्षकांना योग्य वेतन, सन्मान, प्रगतीच्या संधी प्रत्यक्षात आणण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे. शिक्षण संस्था, शिक्षक, शिक्षणेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्याचा प्रयत्न हेच माझे तत्व आहे. विधिमंडळाची ताकद मोठी असून शिक्षण क्षेत्र आणि शासन याच्यामध्ये समन्वयकाची भुमिका बजावण्यासाठी सक्षम शिक्षक आमदार असावा लागतो. मी निवडून आल्यानंतर ती भुमिका पार पाडण्याचे वचन देत असल्याचे पुणे विभागातील शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रा. प्रकाश राजाराम पाटील यांनी “तरुण भारत” शी बोलताना सांगितले.
उच्च शिक्षित, सर्व परिचित, गेली दोन दशकांहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, संस्था चालक यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षण क्षेत्रात महत्वपुर्ण योगदान देणारे प्रा. प्रकाश राजाराम पाटील हे पुणे विभाग शिक्षक मतदार संघात निवडणूक लढवत आहेत.
सातारा जिल्हयाचे सुपुत्र आणि कर्मभूमी पुणे जिल्हा असणाऱ्या प्रा. प्रकाश पाटील यांचा सोलापूर,कोल्हापूर, सांगली, पुणे, सातारा जिल्हयातील जवळपास सर्व शिक्षण संस्थांच्या अडीअडचणीच्या वेळेस केलेली मदत त्यांना मतदान रुपाने त्या संस्थेचे शिक्षक परतफेड करतील.
विधिमंडळात गेल्यावर शिक्षण क्षेत्रातील समस्यांचा निपटारा करण्यासाठी सक्षम शिक्षक मतदार संघाचे आमदार म्हणून प्रकाश पाटील हेच योग्य उमेदवार असल्याचे सर्वांच्या लक्षात येते. सोलापूर, कोल्हापूर, सांगली, पुणे, सातारा जिल्हयातील शिक्षक मतदारांनी आपले पहिल्या पसंदीचे मत प्रा. प्रकाश पाटील यांना देवून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा स्वयंस्फूर्तीने निर्धार केला आहे.
“कमवा व शिका “या योजनेतून विद्यार्थी दशेतील शिक्षण, भारती विद्यापीठात अर्धवेळ नोकरी करत एम. बी. ए. आणि एल. एल. बी. पदवी घेवून बजाज ऑटो या कंपनीत २० वर्षे, त्यांनतर पुण्याच्या सिंहगड इन्स्टिटयूट मध्ये प्राध्यापक आणि संचालक म्हणून सद्या प्रा. प्रकाश पाटील हे कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रातील प्रश्नासाठी आजपर्यंत एक ‘लढवय्या कार्यकर्ता’ असणारे प्रकाश पाटील विधिमंडळात शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून पुणे विभागातून नेतृत्व नक्कीच करतील, असा विश्वास अनेक शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी “तरुण भारत” शी वार्तालाप करताना व्यक्त केला आहे.
गुणवत्ता, सचोटी आणि जनसंपर्काच्या जोरावर प्रा. प्रकाश राजाराम पाटील यांनी मतदार संघात प्रचाराची मोठी आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट आहे. सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी त्यांना आतून पाठिंबा, शिक्षण संस्थांची साथ आणि शिक्षक मतदारांनी आपल्या पहिल्या पसंदीचे मत फक्त प्रा. प्रकाश पाटील यांना देण्याचा पक्का निर्धार केला आहे. पाचही जिल्हयातून त्यांना मिळणारा वाढता पाठिंबा पाहून काही अन्य उमेदवारांनी आत्ताच माघार घेत प्रा. प्रकाश पाटील यांना पाठिंबा देत आपली मते त्यांच्या पारडयात टाकण्यास सुरूवात केली आहे.
शिक्षणासाठी ६ टक्के आर्थिक तरतूद कागदावर असून ती प्रत्यक्षात त्याहून अधिक आर्थिक तरतूद करून घेणे. मुंबई शिक्षक भवन उभारणे, शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्राच्या उज्वल भवितव्यासाठी आणि शिक्षकांचा सर्वांगिण विचार करणारा प्रतिनिधी विधिमंडळात हवा. उच्चशिक्षित, जाणकार मतदार असलेला पुणे विभाग शिक्षक मतदार संघ असून प्रा. प्रकाश राजाराम पाटील यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याने ते विजयाचे प्रबळ दावेदार आहेत.