बेळगाव
विद्यागमअंतर्गत शैक्षणिक वाटचाल सुरू आहे. शिवाय नववी-दहावीचे वर्ग पूर्णवेळ भरत असल्याने शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे. मात्र शिक्षकांच्या रिक्त जागांवर अतिथी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली नसल्याने कार्यरत शिक्षकांवर ताण वाढला आहे. परिणामी शाळेच्या मुख्याध्यापकांवरही वर्ग सांभाळण्याची जबाबदारी आली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी दक्षतेच्या दृष्टीने एका वर्गाचे अनेक विभाग करण्याच्या सूचना आहेत. याची अंमलबजावणी करताना शिक्षकांचा ताण मात्र वाढला आहे.
दरवर्षी शाळा प्रारंभीला अतिथी शिक्षक नियुक्तीला हिरवा कंदील दाखवला जातो. त्यानुसार गरजेप्रमाणे विविध शाळा अतिथी शिक्षकांची नियुक्ती करतात. मात्र यावर्षी ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शाळा सुरू झाल्या. यानंतर विद्यागमला मंजुरी देण्यात आली. परिणामी अतिथी शिक्षकांची गरज भासली नाही. मात्र आता शाळांचे वर्ग सुरळीत सुरू असताना अतिथी शिक्षक नियुक्ती नसल्याने कार्यरत शिक्षकांवर ताण वाढला आहे.
सरकारी शाळेत प्रामुख्याने मुख्याध्यापक पदाचा कार्यभार प्रभारीवर सुरू आहे. यामुळे एका शिक्षकांवर मुख्याध्यापकपदाची जबाबदारी पार पाडण्याबरोबरच वर्ग सांभाळण्याची जबाबदारीही असते. परिणामी कमी शिक्षक असणाऱया शाळांमध्ये अतिथी शिक्षकांची मदत घ्यावीच लागते. सध्या कोरोनामुळे नियुक्ती करण्यात आली नसल्याने हे वर्ष असेच निघून गेले आहे. मात्र 6 वी ते 10 वी वर्गाबरोबरच इ. 1 ली ते 5 वीचे वर्ग सुरू झाल्यानंतर अतिथी शिक्षकांची गरज प्रामुख्याने भासणार आहे.