24 तास डय़ुटीचा कोणताही आदेश नसल्याचे स्पष्टिकरण
प्रतिनिधी / ओरोस:
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या 11 मेच्या आदेशात वेळेचा उल्लेख नसला, तरी 8 मेच्या आदेशाच्या संदर्भानेच समन्वयातून काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्षकांनी कोणत्याही तोंडी आदेशित विधानाला बळी न पडता 10 ते 5 या वेळेतच व्यवस्थापकाचे काम करावे, असे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शुक्रवारी झालेल्या शिक्षण समिती सभेत जि. प. सदस्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना शाळा व्यवस्थापकाचे काम करताना शिक्षकांना कोणत्याही प्रकारची वेळ निश्चित करून देण्यात आली नसून ग्रामस्तरीय समिती, केंद्रप्रमुख आणि शिक्षक यांनी समन्वयातून काम करावे, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी स्पष्ट केले होते. तसेच 11 मेच्या आदेशातून वेळेचा उल्लेख काढून टाकण्यात आल्याचे सांगितले होते. त्यामुळे शिक्षकांना 24 तास डय़ुटी करावी लागणार, या आशयाच्या मथळय़ाखाली प्रसिद्ध झालेल्या विधानावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने आपली भूमिका मांडली आहे.
शाळाशाळांमध्ये तयार केलेल्या संस्थात्मक विलगीकरण कक्षाचे व्यवस्थापक म्हणून मुख्याध्यापकांनी 10 ते 5 या वेळेत कोणती कर्तव्ये पार पाडायची, हे जिल्हा नोडल ऑफिसर तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 8 मेच्या आदेशाने ठरवून दिले आहे. 11 मेचा आदेश हा 8 मेच्या आदेशाचा संदर्भ देऊनच एकमेकांच्या समन्वयाने व्यवस्थापक म्हणून कर्तव्ये कशी पार पाडावी, याचे केंद्रप्रमुखांनी नियोजन करावे, असे सूचित केले आहे. या आदेशात शिक्षकांच्या 24 तास डय़ुटीचा कोणताच उल्लेख नाही, असेही स्पष्ट केले आहे.
दरम्यान 12 मे रोजी झालेल्या सभेतही याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. तसेच 11 मेचा आदेश काढताना 8 मेचा आदेश रद्द केलेला नाही. त्यामुळे वेळेच्या संदर्भातील 10 ते 5 या वेळेचा तो आदेश आजही कायम आहे. या वेळेतच डय़ुटी करावी. कोणाच्याही तोंडी आदेशाला बळी पडू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे जिल्हाध्यक्ष नितीन कदम, जिल्हा सरचिटणीस सचिन मदने, राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, राज्य सहसचिव नामदेव जांभवडेकर, शिक्षक नेते नंदकुमार राणे, राज्य सल्लागार चंद्रकांत अणावकर आणि भाई चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे आणि लवू चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष नारायण नाईक, जिल्हा प्रवक्ता सुनिल चव्हाण, जिल्हा कोषाध्यक्ष लहू दहाफळे, महिला आघाडीच्या सुरेखाताई कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.