‘नोकरी’ हे सर्वसामान्यांच्या सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र आहे. त्यातून ती सरकारी असेल तर स्वर्गाला हातच टेकले, असे मानले जाते. कारण नोकरीत जी सुरक्षितता आहे, ती व्यवसाय, धंदा किंवा अन्य कशात नाही, अशी आपली सावध समजूत असते. तथापि, काही साहसी कलंदर नोकरी फाटय़ावर मारून अन्य वाट चोखाळतात अन् या धाडसी प्रयत्नांमध्ये यशस्वीही होतात.
उत्तर प्रदेशातील श्यामसिंह यांनी हे धाडस दाखविले. त्यांना सरकारी शाळेत शिक्षकाची कायमस्वरूपी नोकरी होती. ती त्यांनी अनेक वर्षे केली. पण मनात कोठेतरी काहीतरी नवे करून दाखविण्याची आस संपलेली नव्हती. एक दिवस हीच आस उसळून आली आणि त्यांनी नोकरीचा त्याग करून शेती करण्याचा निर्णय घेतला. साहजिकच घरच्यांचा विरोध झाला पण त्यांनी तो जुमानला नाही.
शेतीतही नवीनता
शेतीही त्यांना पारंपरिक पद्धतीने नव्हे, तर अभिनव पद्धतीने करायची होती. यासाठी त्यांनी त्यांच्या 10 एकर जागेत ‘अन्नवन’ (फूड फॉरेस्ट) ही अनोखी संकल्पना साकारली. अन्नवन ही अशी शेती असते की जेथे एकाच जागेत हजारो वस्तस्पती, फुलझाले, भाजीपाला, धान्ये, औषधी वनस्पती, फळझाडे इत्यादी उगवली जातात. भूमीच्या एकाच भागात आपल्या अन्नविषयक सर्व आवश्यकता पूर्ण व्हाव्यात, अशी ही कृषीरचना असते. तिचे लाभ अनेक असतात.
लक्षावधी रूपयांचा लाभ
आज 5 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर त्यांचा हा प्रयोग त्यांना लक्षावधी रूपयांचे उत्पन्न मिळवून देत आहे. ते सेंद्रीय पद्धतीची, अर्थात खते आणि कीटनाशके न उपयोगात आणता शेती करतात. अशा शेतीमुळे शुद्ध अन्नधान्ये मिळतात आणि माणसाठी प्रकृती आणि पर्यावरण यांचे संरक्षण होते. शिवाय ही शेती कमी गुंतवणूक आणि कमी श्रमात जास्तीत जास्त उत्पन्न देते. त्यामुळे ती अधिक लाभदायक आहे. आज त्यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी दूरदूरून लोक येतात. त्यांनी पंचस्तरीय उत्पादन योजना साकारली असून त्यांच्या 10 एकरमध्ये आज 100 हून अधिक प्रकारच्या हजारो वनस्पतींची लागवड करण्यात आहे.