सर्व विषयांच्या उमेदवारांना संधी देण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
राज्य सरकारने 15 हजार शिक्षक भरतीची घोषणा केली असली तरी त्यासाठी विविध अटी आणि नियम लागू केले आहेत. भरतीसाठी समाज विज्ञान विषय सक्तीचा करण्यात आला असून त्यामुळे इतर ऐच्छिक विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची गोची झाली आहे. सरकारने ही सक्ती रद्द करून सर्व विषयाच्या उमेदवारांना संधी द्यावी, अशी मागणी होत आहे.
सार्वजनिक शिक्षण खात्याने नुकताच आदेश जारी केला आहे. त्यात सहावी ते आठवीसाठी पदवीधर शिक्षकांच्या नियुक्तीचा आदेश बजावला आहे. दरम्यान, उमेदवारांचे इतिहास, अर्थशास्त्र, भूगोल, राज्यशास्त्र यापैकी दोन ऐच्छिक विषय असावेत, अशी अट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांची अडचण झाली आहे. एकंदर शिक्षक भरतीचा हा फार्सच असल्याचे मानले जात
आहे.यापूर्वी सर्व विषयांचे अध्ययन करणाऱया पात्र उमेदवारांना भरतीत मुभा दिली जात होती. परंतु, नव्याने जारी करण्यात आलेल्या आदेशात अनेक अटी आणि नियम घुसडून सरकारने शिक्षक भरतीलाच हरताळ फासण्याचा प्रयत्न चालविल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.