वाकरे -प्रतिनिधी
विधानपरिषदेच्या पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसकडे उमेदवारी मागितलेल्या मात्र अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ११ मातब्बर उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना,मित्रपक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा.जयंत आसगावकर यांना त्याचा फायदा होणार असून जिल्ह्यातून एकच उमेदवार उभा करण्यात पालकमंत्री सतेज पाटील यांना यश आल्याचे स्पष्ट झाले आहे. या मातब्बर उमेदवारांमध्ये शिक्षक नेते दादासाहेब लाड, महाराष्ट्र राज्य विनाअनुदान कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, राज्य कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील,जनसुराज्य पक्षाचे प्रा.शिवाजी मोरे,शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. डॉ. मानसिंगराव निंबाळकर, इचलकरंजी येथील संभाजीराव खोचरे व अन्य उमेदवारांचा समावेश आहे.
महाविकास आघाडीमार्फत जिल्ह्यातून एकच उमेदवार उभा करण्यासाठी काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीच्यावतीने जोरदार प्रयत्न सुरू होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या माघारीसाठी विशेष प्रयत्न केले होते. काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीप्रसंगी पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुणे विभाग संघातील पदवीधर,शिक्षक मतदारसंघातील एक जागा आम्हाला द्या, निवडून आणण्याची जबाबदारी माझी अशी ग्वाही महाराष्ट्राचे प्रभारी एच.के. पाटील यांना दिली होती.
त्यांनी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करून जिल्ह्यातून एकच उमेदवारी देण्याचा संकल्प पूर्ण केला आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघातून कोल्हापुरातून काँग्रेसकडून प्रा. जयंत आसगावकर तर पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून अरुण लाड यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.माघार घेतलेला सर्वच उमेदवारांनी पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जिल्ह्यातून एकच उमेदवार असावा या आवाहनाला प्रतिसाद देत ,तसेच शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्याची जबाबदारी स्वीकारल्याने आपण सर्वांनी माघार घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या सर्व उमेदवारांनी काँग्रेसचे उमेदवार प्रा.जयंत आसगावकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे.दादासाहेब लाड यांनी गेली वीस वर्षे आपण शिक्षण क्षेत्रात काम करीत असून पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी केलेल्या आवाहनाचा आदर राखून आपली उमेदवारी माघार घेत असल्याचे स्पष्ट केले आहे.माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते नाराज होणार असले तरी सर्वांनी या निर्णयाचा स्वीकार करावा असे स्पष्ट केले आहे. बाबासाहेब पाटील यांनीही मंत्री पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माघार घेत असल्याचे सांगितले.खंडेराव जगदाळे यांनी मंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आणि शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्याची जबाबदारी स्वीकारल्याने आपण माघार घेत असल्याचे सांगितले. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने प्रा.जयंत आसगावकर यांच्यनपाठीशी जिल्हा एकमुखी राहिल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे त्यांचे निवडणुकीतील पारडे जड झाले आहे. दरम्यान आसगावकर यांनी उमेदवारांनी माघार घेऊन आपल्याला पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले आहे.