ऑनलाईन टीम / हिंगोली :
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. या अपघातातून वर्षा गायकवाड थोडक्यात बचावल्या आहेत. आज सकाळी वर्षा गायकवाड यांच्या कारला भरधाव टेम्पोने मागच्या बाजून धडक दिली. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही, अशी माहिती आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड दोन दिवसांपासून हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत. त्या हिंगोलीच्या पालकमंत्री आहेत. वर्षा गायकवाड हिंगोलीतील ऑक्सिजन प्रकल्पाचे उद्घाटन करुन रामलीला मैदानाची पाहणी करण्यासाठी निघाल्या होत्या. यावेळी मागून आलेल्या भरधाव महिंद्रा पीकअपने वर्षा गायकवाड यांच्या कारला मागच्या बाजून धडक दिली. यामध्ये कारचे मागच्या बाजूने नुकसान झाले आहे.
सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झाली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी पीकअप चालकास ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात नेले आहे. त्यानंतर पालकमंत्री प्रा. गायकवाड यांनी रामलिला मैदानावर पाहणी करून नंतर शासकिय विश्रामगृह येथे आल्या नंतर पालकमंत्री गायकवाड याचे वाहनाने औरंगाबादकडे रवाना होणार असल्याचे सांगण्यात आले.