हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचे आदिवासी समाजाला आवाहन, 21 व्या लोकोत्सवाच्या समारोप समारंभात मान्यवरांचा सन्मान
प्रतिनिधी /काणकोण
शिक्षण, प्रशिक्षण, मार्गदर्शन, ताकद यांच्या जोरावर आदिवासी समाजाने मागासलेपणाचा डाग पुसून काढण्यासाठी दूरदृष्टीने मार्गक्रमण करावे, असा सल्ला हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी आमोणे येथील आदर्श ग्रामातील 21 व्या लोकोत्सवाच्या समारोपप्रसंगी बोलताना दिला. या समारोपाच्या सोहळय़ाला केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, बलराम शिक्षणसंस्थेचे संस्थापक असलेले माजी मंत्री रमेश तवडकर, सांगेचे माजी आमदार सुभाष फळदेसाई, बलराम निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका सविता तवडकर, आदर्श युवा संघाचे सचिव श्रीकांत तवडकर, खजिनदार दामोदर वेळीप उपस्थित होते.
काणकोणसारख्या भागात तवडकर, तर हरमलसारख्या भागात माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावून भाऊसाहेब बांदोडकर यांच्या स्वप्नाची पूर्ती केली आहे. येथील युवकांनी गाव न सोडता शेतीवर भर द्यावा. त्याचप्रमाणे या भागातून आयएएस शिक्षण घेणारे युवक तयार व्हावेत, असे आर्लेकर म्हणाले. गोव्यात येणाऱया पर्यटकांना केवळ समुद्रकिनाऱयांवरील संस्कृती दाखविली जाते. त्यात बदल होऊन लोकोत्सवातून ज्या संस्कृतीचे दर्शन घडते ती संस्कृती दाखविण्याचाही प्रयत्न व्हावा, असे ते पुढे म्हणाले.
आंतरिक विकासही महत्त्वाचा : श्रीपाद नाईक
बाहय़ विकासाप्रमाणेच माणसाचा आंतरिक विकास महत्त्वाचा असून आर्थिक प्रगतीबरोबरच आंतरिक प्रगतीची तेवढीच गरज आहे. म्हणून प्रत्येक नागरिकाने आपल्या कर्तव्याचे पालन करताना गाव, राज्य आणि देशाचा विचार करावा, असे आवाहन केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. आयुर्वेदासारख्या क्षेत्राकडे ग्रामीण भागांतील युवकांनी लक्ष द्यावे. पर्यावरणाचा ऱहास न करता औषधी वनस्पतींची गावागावात शास्त्रीय पद्धतीने लागवड करावी आणि त्यासाठी औषधी वनस्पती मंडळाचे सहकार्य घ्यावे, असा सल्ला त्यांनी दिला. सुभाष फळदेसाई यांनी तवडकर यांनी लोकोत्सवासारखे शिवधनुष्य पेललेले असून अशा नेतृत्वाची आज गोव्याला गरज असल्याचे मत व्यक्त केले.
मान्यवरांचा सन्मान
यावेळी डॉ. पांडुरंग अनंत भट, भगिरथ शेटये, मधू अनंत नाईक, चंद्रलेखा मेस्त्राr, गोविंदराज यशवंत देसाई, डॉ. मनोज कामत, ऍड. धर्मानंद वेर्णेकर, विनोद दिनानाथ धामस्कर, संतोष शिवनाथ तारी, सदानंद गावडे, चंद्रकांत सुदिर, विवेक ना. गावकर, सुरेश गावडे, हेमू गावडे, वरद नागेश सामंत, संजीव वेरेंकर, गण्sाश शेटकर, काशिनाथ नाईक, ऍड. शिवाजी देसाई, कांता गायक, काशिनाथ फळदेसाई, आनंद प्रभुदेसाई, प्रशांत गावकर, रोहिदास गावडे, अशोक गावडे, विलास पालकर, प्रदीप पैंगीणकर, अंजली गावकर, रजनी विलास नाईक, प्रताप गावकर, डॉ. विद्या गावडे आणि अन्य मान्यवरांचा राज्यपाल आर्लेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
स्वागत व प्रास्ताविक करताना तवडकर यांनी वैचारिक क्रांतीचा उद्रेक म्हणजे लोकोत्सव असल्याचे आणि आश्रमशाळा हे त्याचे फलित असल्याचे सांगून याकामी सहकार्य केलेल्या आदर्श युवा संघाच्या कार्यकर्त्यांना त्याचे श्रेय दिले. सत्कारमूर्तींच्या वतीने बोलताना गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शेटय़े म्हणाले की, तवडकर यांनी नेहमीच जमिनीवर पाय ठेवले आणि प्रगतीकडे लक्ष दिले. गोव्यातील युवक आयएएससारख्या स्पर्धात्मक परीक्षांकडे दुर्लक्ष करतात. आश्रमशाळेतून आयएएस परीक्षेला बसणारे विद्यार्थी तयार व्हावेत, असे ते म्हणाले. सूत्रसंचालन संजय गावकर, स्वप्नाली पागी, सुविधा कोमरपंत यांनी केले. कल्पिता, वर्षा, वंदना, अश्विता, सोनिया, गीता यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ प्रदान केले. हिमाचल प्रदेशातून आलेल्या लोकनृत्य पथकाच्या प्रमुखांनी यावेळी राज्यपाल आर्लेकर आणि केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री नाईक यांचा हिमाचल प्रदेशची पारंपरिक टोपी देऊन गौरव केला. तर तवडकर यांनी आर्लेकर, श्रीपाद नाईक, सुभाष फळदेसाई यांना स्मृतिचिन्हे भेट दिली. लोकोत्सवाच्या समारोपाच्या वेळी महाराष्ट्र, राजस्थान, ओरिसा, हिमाचल प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक राज्यांतून आलेल्या लोककलाकारांनी तसेच गोमंतकीय लोककलाकारांनी बहारदार अशी नृत्ये सादर केली. आर्लेकर आणि श्रीपाद नाईक यांनी लोकोत्सवातील औषधी वनस्पतींची दालने तसेच खाद्यपदार्थ आणि कंदमुळांच्या दालनांना भेट देऊन कौतुक केले.