- बच्चेकंपनीसाठी लिखित सुरस कथा पुस्तकाचे प्रकाशन
ऑनलाईन टीम / पुणे :
लहान वयात संस्कारांचे संक्रमण होणे आवश्यक आहे. ते झाले नाही तर पुढची पिढी कुठे जाईल हे सांगता येणार नाही. मोबाईलने लहान मुलांचे विश्व विस्कळीत केले आहे. गोष्टींच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी या भावना निर्माण होतात. लहान मुलांना देण्यात येणाºया शिक्षणातून भावनांचा, अंत:करणाचा विकास व्हायला हवा, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. अ.ल. देशमुख यांनी व्यक्त केले.
प्रतिभा लष्करे लिखित सुरस कथा या लहान मुलांकरीता लिखीत पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन मित्रमंडळ कॉलनी जवळील महालक्ष्मी सभागृह येथे करण्यात आले होते. यावेळी प्रख्यात व्यंगचित्रकार चारुहास पंडीत यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी लेखिका प्रतिभा लष्करे, तुषार लष्करे उपस्थित होते.
डॉ.अ.ल. देशमुख म्हणाले, लहान वयात ज्या गोष्टी लहान मुलांना सांगितल्या जातात. त्यातून अनेक भावना मुलांमध्ये रुजतात. मुले मोठी झाल्यावर या भावना कायम राहतात. त्यामुळे संस्काराची मुल्ये लहान वयात रुजणे आवश्यक आहे. 4 पिढ्यांनी एकत्र येऊन तयार केलेले सुरस कथा हे पुस्तक आहे. यातील रेखाचित्रे गोष्टींना सुसंगत आहेत, असेही त्यांनी पुस्तकाविषयी बोलताना सांगितले.
चारुहास पंडीत म्हणाले, आजकाल मोबाईल, लॅपटॉप या माध्यमातून गोष्टी ऐकायला आणि पहायला मिळतात. तो एक चांगला अनुभव असतो. परंतु आई,बाबा आजी यांच्या तोंडून गोष्टी ऐकणे हा जीवंत अनुभव आहे. युट्यूबपेक्षा प्रत्यक्ष गोष्टी सांगण्यावर भर असायला हवा. मुलांसोबत संवाद ठेवायला हवा.
प्रतिभा लष्करे म्हणाल्या, मुलांना गोष्टी सांगताना, गोष्टी लिहून काढायचा विचार मनात आला आणि त्यातून सुरस कथा या पुस्तकाची निर्मिती झाली. पुस्तकामध्ये लहान मुलांसाठी विविध कथांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. तन्वी लष्करे आणि रोहीत चांदोरीकर यांनी सूत्रसंचालन केले.