पाल सत्तरी येथील दुर्दैवी घटना दहावीच्या वर्गात होता विद्यार्थी
वाळपई / प्रतिनिधी
सत्तरी तालुक्यातील पाली ठाणे या ठिकाणी दहावीत शिक्षण घेणाऱया मुलाने ऑनलाइन शिक्षण वर्गासाठी मोबाईल उपलब्ध नसल्यामुळे आत्महत्या करण्याचा दुर्दैवी प्रकार घडलेला आहे. त्याचे नाव रोहित भागो वरक असे असून तो ठाणे येथील सरकारी माध्यमिक विद्यालय दहावीच्या वर्गात शिकत होता. या प्रकारामुळे सरकारच्या ऑनलाईन पद्धतीच्या वर्गामुळे पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली असून त्यावर सरकारने जरूर विचार करावा अशा प्रकारची मागणी करण्यात येत आहे.
मोबाईल नादुरुस्तीमुळे दुर्दैव
ऑनलाइन पद्धतीच्या शिक्षणासाठी रोहित याच्या वडिलांनी त्याला मोबाईल आणून दिला होता. मात्र दोन दिवसांपूर्वी सदर मोबाईल पडून तो नादुरुस्त बनल्यामुळे त्याची अडचण निर्माण झाली होती. सदर मोबाईल दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी वडिलांकडे पैसे मागितले होते. मात्र वडिलांची आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्यामुळे दोन दिवसांनी आपण पैशाची व्यवस्था करतो असे त्यांनी सांगितले होते.
वडिलांनंतर आजीकडे मागीतले पैसे
वडिलांकडे पैसे नसल्यामुळे रोहितने आज सकाळी आपल्या आजीकडे यासाठी पैसे मागितले. सदर आजीला दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत पैसे मिळत होते. मात्र गेल्या अनेक महिन्यापासून तिच्या खात्यावर पैसे जमा न झाल्यामुळे तिने आपल्याकडे पैसे नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे त्यांनी आपल्या राहत्या घरीच गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रकार घडला. ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी त्याची आई घराच्या मागच्या बाजूला कपडे धूत होती.
कपडे धुऊन आई घरात आली असता रोहित यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला .यावेळी त्यांनी या संदर्भात माहिती शेजाऱयांना देण्यात आल्यानंतर अनेकजण घरांमध्ये धावून त्याने आत्महत्या केल्याचे चित्र पाहिल्यानंतर अनेकांमध्ये खळबळ निर्माण झाली. यासंदर्भाची माहिती वाळपई पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला .त्याचप्रमाणे 108 सेवेला निमंत्रित करण्यात आल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. यामुळे सध्यातरी सदर भागांमध्ये खळबळ निर्माण झाली असून सत्तरी तालुक्मयातून संमिश्र अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत.
घराची आर्थिक परिस्थिती बिकट
रोहित यांचे वडील भागो वरक हा एका खासगी बसेसवर चालक म्हणून काम करत होते. मात्र कोरोना रोगाच्या महामारी गेल्या चार महिन्यापासून ते घरीच आहे. काम नसल्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. रोहित याच्या आजीला दयानंद सामाजिक सुरक्षा व त्याच्या आईला ग्रहलक्ष्मी त्याची आर्थिक रक्कम मिळत होती. मात्र गेल्या काही महिन्यापासून सरकारने ही रक्कम लाभार्थींच्या नावावर जमा न केल्यामुळे अनेकांचे आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. नादुरुस्त असलेला मोबाईल दुरुस्त करण्यासाठी त्यांच्या वडीलाकडे पैसे नसल्यामुळे हा दुर्दैवी प्रकार घडला. रोहित याला मोठी बहिण असून ती उच्च माध्यमिक शिक्षण घेत आहे तर त्याच्या छोटा भाऊ हा सातवी वर्गात शिक्षण घेत असल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे.
दरम्यान या प्रकारामुळे सत्तरी तालुक्यात खळबळ निर्माण झाली आहे. वाळपई पोलिसांनी या संदर्भाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा रोहीत यांच्यावर शोकाकुल अवस्थेत अंतिम संस्कार करण्यात आले.