दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांची मानसिकता जाणून घेण्यासाठी त्यांना काही प्रश्न विचारले असता एका विद्यार्थिनीने दहावीनंतर कॉमर्स करायचे आहे, त्यानंतर एलएलबी करून युपीएससीची परीक्षा द्यायची आहे, असे सांगितले. त्याचे कारण विचारले असता ती म्हणाली की तिच्या आई-वडिलांचे स्वप्न तिला पूर्ण करण्यासाठी तिला जिल्हाधिकारी होण्याची इच्छा आहे. दुसऱया मुलीला असेच काही प्रश्न विचारले असता, तिने बारावी सायन्सनंतर मेडिकलला प्रवेश घेण्याचा मानस व्यक्त केला. त्याचे कारण विचारता, तिनेसुद्धा वडिलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले. एका विद्यार्थ्याला कॉम्प्युटर इंजिनिअर का बनायचे आहे, असे विचारल्यावर त्याने कोडींग करायला आवडते असे सांगितले. यापैकी जिल्हाधिकारी होऊ इच्छिणाऱया मुलीला महाराष्ट्रातील दहा जिह्यांची नावे सांगता आली नाहीत, डॉक्टर होऊ इच्छिणाऱया मुलीला दहावीच्या पुस्तकातील जीवशास्त्राच्या पुस्तकातील पाच धडय़ांची नावे सांगता आली नाहीत आणि कॉम्प्युटर इंजिनिअर होण्याचे दिवास्वप्न बघणाऱया विद्यार्थ्याला कोडींग म्हणजे काय हे माहीत नव्हते. पण फक्त आयटी इंडस्ट्रीमध्येच मुबलक पगार मिळतो, असा त्याचा गैरसमज होता. यामध्ये चूक फक्त घोकंपट्टीने शिकणाऱया विद्यार्थ्यांची नाही, तर त्यासाठी आपली स्वप्ने मुलांवर लादणारे पालक, शिक्षणाचा रोजच्या आयुष्याशी सांगड न घालणारे शिक्षक आणि काळाप्रमाणे न बदलणारी शिक्षण व्यवस्थाही तितकीच जबाबदार आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वांनी एकमेकांकडे बोट दाखवत राहिले तर सर्वांचे होणारे नुकसान बघत बसणे एवढाच पर्याय शिल्लक राहतो. यावर उपाय काय? तर, विद्यार्थी-पालक-शिक्षक यांनी स्वतःला पाचवेळा ‘का?’ असे प्रश्न विचारावेत. पहिला प्रश्न ः ‘शाळेत का जायचे आहे?’, ‘शाळेनंतर कॉलेजमध्ये का शिकायचे आहे?’, ‘आपल्या मुला-मुलीला का शिकवायचे आहे?’, ‘शिक्षक-प्राध्यापक का व्हायचे आहे?’ याचे उत्तर मिळाल्यानंतर दुसरा ‘का?’ प्रश्न विचारावा.
शिक्षण कशासाठी घ्यायचे, हेच प्रत्येकाने ठरवायला हवे. विद्यार्थी/विद्यार्थिनी एखाद्या लहान गावात शेतामध्ये मजुरी करणाऱया पालकांचे असोत वा शहरातल्या वस्तीमध्ये दहा बाय दहाच्या खोलीत राहणारे असोत वा तथाकथित इंटरनॅशनल स्कूलमध्ये हाय-फाय शिक्षण घेणारे असोत, सर्वांनीच आपण शिक्षण का घेत आहोत हा प्रश्न स्वतःला विचारावा. बऱयाच जणाना पदवीनंतर चांगले करियर घडवायचे असेल, अनेकांना भरपूर पैसे मिळवायची इच्छा असेल, काहीजणांना ठराविक हुद्याचे आकर्षण असेल, काहीजणांना स्वतःचा उद्योगधंदा सुरु करायचा असेल किंवा असलेला उद्योग वाढवायचा असेल. उद्या काय करायचे आहे ते स्वप्न पूर्ण होणार की नाही याचे उत्तर आपण आज काय करत आहोत, यामध्ये मिळते. शालेय शिक्षणात इतिहास, भूगोल विषय आवडत नसतील तर किमानपक्षी आपल्या देशातील राज्यांमधील वैविध्य, महाराष्ट्रातील विविध जिह्यांची थोडक्मयात माहिती सांगता येणार नाही. ‘भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले?’ या प्रश्नाच्या उत्तराबद्दल आपल्या मनात संदिग्धता असेल तर याचा अर्थ आपले शालेय शिक्षण पूर्ण झालेले नाही असा होतो. ‘स्वातंत्र्य म्हणजे काय?’ याचा अर्थ समजल्याशिवाय देशाचे स्वातंत्र्य म्हणजे काय, हे कसे समजणार? सर्दी-पडसे झाल्यानंतर किंवा ऍसीडीटीचा त्रास होत असेल तर काय घरगुती उपाय करावेत हे बोर्डाची परीक्षा न दिलेली आजी सहज सांगू शकते परंतु दहावीमध्ये नव्वद टक्के मार्क मिळवणारा विद्यार्थी काही सांगू शकत नसेल तर त्या मार्कांचा काय उपयोग? आठवडय़ाची भाजी दोन पिशव्या भरून घेतल्यानंतर त्याचा हिशेब रस्त्यावर भाजी विकणारी ‘अशिक्षित’ बाई तोंडी करू शकते. परंतु आठवी-नववीत शिकणारी विद्यार्थिनी असा हिशेब तोंडी करू शकत नसेल तर सुशिक्षित कोण?
शाळेत शिकूनही रोजच्या व्यवहारातील हिशेब वही-पेन-कॅलक्मयुलेटरशिवाय करता येत नसतील तर आपलाच अभ्यास कुठेतरी चुकतो आहे हे ओळखता यायला हवे. यावर उपाय म्हणून काही पालक आपल्या पाल्याचे नाव त्या त्या विषयाच्या क्लासमध्ये घालतात. कोणताही क्लास लावल्यामुळे कोणतेही प्रश्न सुटत नसतात. इंग्लिश स्पिकिंगचा कोर्स लावल्यानंतर त्या क्लासमध्ये विद्यार्थ्यांना पुढे येऊन बोलण्याची जेव्हा संधी दिली जाते तेव्हा ‘दुसऱया कोणीतरी बोलावे, मी बोललो तर लोक हसतील’ अशी समजूत बाळगणाऱयांना क्लासचा काहीही उपयोग होत नाही. एमएस-सीआयटी कोर्सचा उद्देश ‘बेसिक कॉम्प्युटर स्किल्स शिकणे’ हा असतो, परंतु क्लासमधील सर्व व्याख्यानांना हजेरी लावल्यामुळे अशी स्किल्स येत नसतात, त्यासाठी त्याच कॉम्प्युटर क्लासमध्ये रोज किमान दोन तास पद्धतशीर प्रॅक्टिस करावी लागते अन्यथा फक्त सर्टिफिकेट हातात येते आणि कोर्ससाठी भरलेले पैसे वाया जातात.
यासाठी विद्यार्थी, पालकांनी आपल्या घरात वेगवेगळे उपक्रम राबवायला हवेत. पोळय़ांची कणिक भिजवताना आईने आपल्या तिसरीतल्या मुलाला बरोबर घेऊन त्याला पाण्यात तेल मिसळायला सांगितले, त्यामध्ये मीठ घातल्यानंतर गव्हाचे पीठ कसे घालायचे हे सांगितले तर तिसरी चौथीमधला मुलगा पाण्यावर तेल कसे तरंगते ते बघेल. दरमहा घरी जे किराणा सामान आणले जाते त्याची यादी करणे, त्या जिन्नसांचा आता बाजारात काय दर आहे याची घरात मुलांसमोर चर्चा करणे असे करता करता आपले दरमहा उत्पन्न किती, खर्च किती याची चर्चा केली तर पाचवी सहावीमध्ये शिकणारा पाल्य अशा सामानाची यादी स्वतः करेल आणि त्यानंतर नववीच्या अर्थशास्त्रातील ‘बजेट’ हा धडा पहिल्याच वाचनामध्ये समजेल. रोजच्या आयुष्यातील कामांमध्ये आई-वडिलांनी आपल्या पाल्यांना अशाप्रकारे समाविष्ट करून घेतले तर त्यांना पुस्तकी ज्ञानाचा रोज वापर कसा होतो, हे समजते आणि त्यांचा शालेय अभ्यास पाठांतर न करता पक्का होतो.
या लेखमालेमध्ये शालेय शिक्षणापासून कॉलेजचे शिक्षण कसे आनंददायी करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले जाईल. आपल्या आवडीच्या विषयांबरोबर नावडत्या विषयांचा अभ्यास कसा करता येईल यासंबंधी काही भन्नाट आयडीया सुचवल्या जातील. अलीकडे विद्यार्थी, पालक, शिक्षकांसह आम जनतेचे वाचन कमी झाले आहे. गेल्या दीड वर्षात मोबाईलवरील शिक्षणामुळे वाचनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यामुळे वाचनाची सवय कशी लावता येईल याबद्दल काही सुचवता येईल. कॉलेजशिक्षणासाठी आर्ट्स-सायन्स-कॉमर्सपैकी कोणतीही शाखा निवडताना आपली आवड कशी ओळखावी यासंबंधी उहापोह होईल. पाठांतर न करता एक-दोन वाचनामध्ये धडे कसे समजून घेता येतील याबद्दल काही सुचवता येईल. वाढत्या वयानुसार आणि बदलत्या काळानुसार अभ्यास करण्याचे तंत्र बदलणे गरजेचे आहे, त्याविषयी विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही काही सुचवता येईल. अशा या लेखमालेचा उद्देश शिक्षण आनंददायी करणे हा असेल. पाचवीपासून आणि दहावीनंतर अभ्यास करण्याची पद्धत कशी बदलावी, अभ्यासाचे नियोजन कसे करावे, याबद्दल पुढील लेखामध्ये.
– सुहास किर्लोस्कर