प्रतिनिधी / पन्हाळा
अलीकडील काळात महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या काही अशैक्षणिक व चुकीच्या निर्णयाने असंतोष निर्माण झाला आहे. तसेच शिक्षण क्षेत्रात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याबाबत पन्हाळा तालुक्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवून तहसीलदार रमेश शेंडगे यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात शिक्षण क्षेत्रातील शिक्षक-कर्मचाऱ्यांना लागू केलेली नवीन अंशदायी पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागू करणे, अनुदानास पात्र ठरलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांवरील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेतन अनुदानाचे पुढील टप्पे प्रचलित नियमानुसार मंजूर करावे, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घोषित करण्यात आलेला महागाई भत्ता राज्यातील शिक्षक-कर्मचाऱ्यांना त्वरित लागू करावा, आर.टी.ईच्या धोरणानुसार शाळा तेथे प्रयोगशाळा सहाय्यक, परिचर व ग्रंथपाल नेमावेत, सन २०१८- २०१९ व यापुढील संचमान्यताबाबतचे शासन धोरण स्पष्ट करणे, दिनांक ३० जूनला सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक-कर्मचाऱ्यांना ०१ जुलैची वेतन वाढ लागू करणे यासह १७ महत्वाच्या प्रलंबित मागण्याचे निवेदन देण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक संघाचे संचालक श्रीकांत पाटील यांनी मोर्चाबाबत मार्गदर्शन केले.
या मोर्चाचे निवेदन पन्हाळा-बावडा तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. आर. पाटील, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे संचालक श्रीकांत पाटील व अजित रणदिवे, श्वेता गोडबोले, मारुती बोरगे, शशिकांत मोरे, वसंत पाटील, बी. के. मोरे, उत्तम पाटील, बाबा चौगले, उदय पाटील, रवींद्र इंगवले, विलास पाटील, पांडुरंग शिंदे यांच्यासह सर्व शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.