त्यांच्या बँक खात्यात रकमा झाल्या जमा : समितीच्या चौकशीत माहिती उघड
वार्ताहर / देवगड:
देवगड पंचायत समितीच्या शिक्षण विभागात एका कर्मचाऱयाने कोटय़ावधी रुपयांचा आर्थिक अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघड झाला होता. या प्रकरणाच्या प्रशासकीय चौकशीत संशयितासह अजून 12 सहकारी कर्मचाऱयांचा या भ्रष्टाचारात समावेश असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे प्रथम चार कर्मचाऱयांसह या भ्रष्टाचारातील सहभागी कर्मचाऱयांची संख्या 16 वर पोहोचली आहे.
2010 ते 2015 या कालावधीमध्ये शिक्षण विभागातील तत्कालीन लिपिकाने एक शिपाई व दोन कर्मचाऱयांच्या मदतीने भ्रष्टाचार केल्याचे उघड होत आहे. सुमारे दोन कोटीचा हा भ्रष्टाचार असून जि. प. अध्यक्षांच्या आदेशानुसार जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षणाधिकाऱयांना दिलेल्या आदेशानुसार या प्रकरणासाठी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या समितीने चौकशी सुरू केली असून या प्रकरणात केवळ चारच कर्मचारी नव्हे, तर बारा कर्मचाऱयांचा सहभाग असल्याचे समोर येत आहे. संबंधित लिपिकाने शिक्षण विभागातील त्या बारा कर्मचाऱयांच्या बँक खात्यावर काही रकमा वळविल्या आहेत. ही रक्कम त्या कर्मचाऱयांना का वळती केली, याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. मात्र, काहींकडून उधार रक्कम घेऊन ती परत करण्यासाठी त्या लिपिकाने शिक्षण विभागातील अनेक खात्यांवरून रक्कम दिल्या आहेत, असे चौकशीत उघड होत आहे.
भ्रष्टाचारातील रकमेची वसुली सुरू
शिक्षण विभागातील बारा कर्मचाऱयांचा या भ्रष्टाचारात प्रत्यक्ष सहभाग घेतला नसला, तरी विभागातील खात्यातून त्या रकमा वळत्या झाल्याने त्यांचाही सहभाग या भ्रष्टाचारात दिसून येत आहे. एखाद्याच्या पडत्या काळात मदतीचा हात द्यावा आणि त्यांनी गद्दारी करत दगा द्यावा, असे काम त्या लिपिकाने त्या 12 कर्मचाऱयांकडून केल्याचे समजते. त्या 12 कर्मचाऱयांकडून लेखी म्हणणे घेत त्यांच्या खात्यावर जमा झालेली रक्कम वसूल करण्याचे कामही सुरू केले जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे.
अपहारात काही वरिष्ठ अधिकाऱयांचा सहभाग?
शिक्षण विभाग किंवा अन्य विभागाची दरवर्षी आर्थिक तपासणी होत असते. 2010 ते 2015 या वर्षामध्ये याही विभागाचे हिशोब तपासणी अहवाल तयार करण्यात आले होते. या तपासणी अहवालामध्ये कोटय़वधीचा अपहार का उघड झाला नाही? हा अपहार लपविण्यासाठी काही वरिष्ठ अधिकारीवर्गाचा सहभाग होता का? याचाही खुलासा या चौकशी अहवालातून होईल का, याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.