सुटकेच्या प्रतीक्षेत असलेल्या बन्नंजे राजाला शिक्षा होणार : तब्बल 19 वर्षानंतर आणले कर्नाटकात : 14 ऑगस्ट रोजी बंदोबस्तात आणले बेळगावला : मुंबई, बेंगळूर, उडपी, कारवारसह केरळ व उत्तर प्रदेशातही गुन्हे
प्रतिनिधी / बेळगाव
बन्नंजे राजा हे नाव कर्नाटकात अधूनमधून ठळक चर्चेत असते. परदेशात राहून कर्नाटकासह विविध राज्यांत गुन्हेगारी कारवाया करणाऱया राजाला 6 ऑगस्ट 2015 रोजी कर्नाटक पोलिसांनी मोरोको येथे ताब्यात घेतले होते. 14 ऑगस्ट रोजी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत त्याला बेळगावला आणण्यात आले होते. तेंव्हापासून राजा हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्धतेत आहे.
कारवार येथील उद्योजक आर. एन. नायक खूनप्रकरणात त्याच्यावर कोका (कर्नाटक संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यातील कोका अंतर्गत दाखल झालेला हा पहिला खटला आहे. आफ्रिकेतील मोरोको येथे राहून राजा गुन्हेगारी कारवाया चालवायचा. उडपीचे तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख अण्णा मलई यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकातील अधिकाऱयांनी त्याला बेळगावला आणले होते.
बन्नंजे राजाला अटक झाली त्यावेळी पी. कृष्णभट्ट हे न्यायाधीश होते. राजा हा मूळचा उडपी जिल्हय़ातील बन्नंजे येथील राहणारा. मल्पेजवळील कलमाडी येथे त्याने प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. ब्रम्हावर येथे हायस्कूलमध्ये शिकताना शिक्षकाला मारहाण करून त्याने आपल्या गुन्हेगारी कारकीर्दला सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय कायद्याचे चांगले ज्ञान असल्यामुळेच बन्नंजे राजा हा परदेशात राहून भारतात गुन्हे करण्यात पटाईत बनला.
मुंबई, बेंगळूर, उडपी, कारवारसह केरळ आणि उत्तर प्रदेशमध्येही राजाने गुन्हे केल्याचे उघडकीस आले असून त्याच्यावर 44 गुन्हे नोंद आहेत. इंटरपोल व रॉच्या मदतीने कर्नाटक पोलिसांनी त्याला मोरोको येथे ताब्यात घेतले होते. 3 कोटींची खंडणी देण्यास नकार देणारे उद्योजक आर. एन. नायक यांची गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या सुरक्षारक्षकाने केलेल्या गोळीबारात एका गुन्हेगाराचाही मृत्यू झाला होता.
21 डिसेंबर 2013 रोजी मारुती व्हॅनमधून आलेल्या विवेक उपाध्याय (उत्तर प्रदेश), जगदीश पटेल (उत्तर प्रदेश), अभी ऊर्फ अंबाजी बंडगार (विजापूर) आणि गणेश ऊर्फ मंजुनाथ बजंत्री (उडपी) यांनी उद्योजक आर. एन. नायक यांच्यावर गोळीबार केला होता. त्यांच्या सुरक्षा रक्षकाने केलेल्या गोळीबारात विवेक उपाध्याय हा जागीच ठार झाला होता तर जगदीश पटेल याला पकडण्यात आले होते. अंकोला येथे हा थरार घडला होता.
जगदीश पटेलच्या चौकशीतून या प्रकरणी बन्नंजेराजाचा सहभाग उघड झाला होता. खरेतर 1998 पासून परदेशात राहतो. तेथूनच तो आपली सूत्रे हलवित होता. मोरोको येथून खंडणीसाठी तो फोन करायचा. तो स्वतःला बी. कंपनी असा समजायचा. जशी दाऊद गँगची डी कंपनी अशी ओळख आहे तशीच बन्नंजे राजा आणि त्याच्या टोळीची बी कंपनी अशी ओळख निर्माण झाली. तब्बल 19 वर्षानंतर 14 ऑगस्ट 2015 रोजी पोलिसांनी त्याला कर्नाटकात आणले.
भारतात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
बिहार, उत्तर प्रदेश व आंध्रप्रदेशमधील सराईत गुन्हेगारांचा वापर करून बन्नंजे राजा भारतात गुन्हेगारी कारवाया करायचा. अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक प्रताप रेड्डी व त्यांच्या टीमने बन्नंजे राजाला भारतात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. विमानाने मोरोकोहून दिल्लीला, तेथून बेंगळूरला आणि बेंगळूरवरून थेट बेळगावात आणण्यात आले होते, अशी पार्श्वभूमी असणाऱया बन्नंजे राजा उद्योजक आर. एन. नायक खून प्रकरणात दोषी ठरला आहे.
मुत्ताप्पा रैशी मैत्री का नाही टिकली?
बन्नंजे राजाचे वडील एम. सुंदर हे निवृत्त रेह्यून्यू इन्स्पेक्टर तर आई विलासिनी निवृत्त शिक्षिका. या दाम्पत्याला तीन मुले. मोठा मुलगा किरणचा मृत्यू झाला आहे. दुसरा अरुण मत्स्य व्यवसाय करतो. तर तिसरा मुलगा राजा ऊर्फ राजेंद्रकुमार हा नववीत शिकताना एकावर चाकू हल्ला केला होता. त्यानंतर पाठोपाठ चाकू हल्ल्याचे प्रकार सुरूच ठेवले. दहावीत नापास झाल्यानंतर पुन्हा परीक्षा देऊन पास झाला. उडपी येथील सरकारी कॉलेजमध्ये अकरावीसाठी प्रवेश घेतला. मात्र त्याच्या वागणुकीत काही फरक पडला नाही. पियूसीत शिकतानाही त्याचा उपद्रव काही थांबला नाही. कॉलेजमध्ये असतानाच गुन्हेगारी टोळय़ांच्या संपर्कात तो आला. बन्नंजे राजा आणि गोल्डन शेट्टी गँगमध्ये गँगवार क्हायचे. उडपी येथून बाहेर पडल्यानंतर बन्नंजे राजाने बेंगळूर येथे हॉटेल आणि बार खोलले होते. काही वर्षे मांडोवी टुर्स ऍण्ड टॅक्हल्स कंपनीही त्याने चालविली. बेंगळूर येथील गुन्हेगारी कारवायानंतर बनावट पासपोर्टच्या माध्यमातून परदेशात जाण्यासाठी बन्नंजे राजाला मुत्ताप्पा रै ने मदत केली होती. नंतरच्या काळात या दोघांमध्येही संबंध चांगले राहिले नाहीत.