ऑनलाईन टीम / तरुण भारत
कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमधील हिजाब बंदीला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या आहेत. इस्लाममध्ये हिजाब घालणे ही आवश्यक धार्मिक प्रथा नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने म्हटले की, शालेय गणवेशावर विद्यार्थी आक्षेप घेऊ शकत नाहीत. यावरुन समाजात आता प्रतिक्रिया येत असुन अबू आझमी यांनी ही यावरुन प्रतिक्रिया देत शिखांच्या पगडीला विरोध नाही मग हिजाबला का ? असा सवाल उपस्थित केला आहे.
यावर बोलताना आझमी यांनी “कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत आहे. पण हा निर्णय चुकीचा आहे. कोण काय परिधान करणार आणि काय खाणार हे त्या – त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. शीख धर्मियांसाठी पगडी आणि तलवार त्यांच्या समाजात अनिवार्य आहे. आणि त्यांना कोणी थांबवू शकत नाही. शीख व्यक्तीला तुम्हा पगडी काढायला सांगाल का ? तेव्हा तुम्ही काय बोलत नाहीत. मुस्लीम समाजासोबत अन्याय होत आहे.
कोर्टाने काहीही म्हटले तरी मुस्लीम समाजामध्ये हिजाब घालणे हा इस्लामचा भाग आहे. हिजाब इस्लामचा अविभाज्य भाग नसल्याचे मी कसे मान्य करु ? आम्ही हे लहाणपणापासून वाचत आलो आहोत. या निर्णयामुळे मुस्लिमांसाठी दरवाजे चारही बाजूने बंद केले जात आहे,” अशी प्रतिक्रिया अबू आझमी यांनी एका वृत्तवाहीनाशा बोलताना दिली . “देशात बेरोजगारी, भ्रष्टाचार हे मुद्दे आहेत. हे मुद्दे सोडून फक्त हिंदू, मुस्लीमच्या मुद्दयांवर चर्चा करणे देशासाठी नुकसान करणारे आहे. मी याच्यासोबत सहमत नाही,” असेही अबू आझमी यांनी म्हटले आहे.