वार्ताहर / बागणी
जम्मू-काश्मीरमधील शोपिया जिह्यातील झेनपुरा येथे 19 फेब्रुवारी रोजी आतंकवाद्यांच्या शोधमोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत वाळवा तालुक्यातील शिगाव येथील रोमित तानाजी चव्हाण (23) यांना वीरमरण आले. सोमवारी सकाळी त्यांच्या मूळ गावी पार्थिवावर वारणा नदी काठावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, अंत्ययात्रेत ‘रोमित चव्हाण अमर रहे!’ अशा घोषणा देण्यात आल्या. पालकमंत्री जयंत पाटील यांनी रोमित यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन चव्हाण कुटुंबियांचे सांत्वन केले.
हुतात्मा रोमित चव्हाण अमर रहे, भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद, जय जवान जय किसन, अमर रहे अमर रहे वीर जवान अमर रहे, वंदे मातरम्, जब तक सूरज चांद रहेगा रोमित तुम्हारा नाम रहेगा, अशा घोषणांनी वारणा काठ दुमदुमला होता. रोमित यांचे पार्थिव पुणे येथून इस्लामपूर येथे आणण्यात आले होते. ते सोमवारी सकाळी सहा वाजता पार्थिव शिगाव मध्ये पोहोचले. गावातील रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढली होती. तर अनेक ठिकाणी फुलांचा सडा पसरला होता. रोमित यांचे पार्थिव गावात येताच अनेकांनी हंबरडा फोडला. घरच्या लोकांसाठी दर्शन घेण्यासाठी अर्धा तास पार्थिव घरी ठेवण्यात आले होते. यावेळी पोलीस दलाच्या वतीने गार्ड ऑफ ऑनर सलामी देण्यात आली.
यांनतर गावातील प्रमुख हुतात्मा राजेंद्र पाटील चौकात गावकऱयांच्या दर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले होते. यावेळी दर्शनासाठी शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ, महिला यांची मोठी गर्दी केली होती. त्यानंतर गावातील प्रमुख मार्गांवरून अंत्ययात्रा नदी काठावर पोहोचली. या अंत्ययात्रेत हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी होत दुःख व्यक्त करत होते. यावेळी पालकमंत्री जयंतराव पाटील, आम. सदाभाऊ खोत, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील, जिल्हा अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलिस प्रमुख दीक्षित गेडाम, प्रांताधिकारी संपत खिलारी, कर्नल प्रदीप ढोले, पी. आर. पाटील, विभागीय पोलीस अधीकारी कृष्णांत पिंगळे, तहसीलदार प्रदीप उबाळे, अप्पर तहसीलदार धनश्री भांबुरे, जि प सदस्य संभाजी कचरे, वैभव शिंदे, उत्तम गावडे, बाजीराव देशमुख, मनीषा गावडे, विजय पाटील, आई वडील यांनी पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली.
त्यानंतर चीफ ऑफ आर्मी स्टाफ व सदन कमांड यांनी देखील पुष्पचक्र अर्पण केले. 1 राष्ट्रीय रायफल 109 इन्फंन्ट्री बटालियन (मराठा) सेने कडून सलामी देण्यात आली. त्यानंतर सांगली पोलीस दलाकडून 3 राऊंड हवेत फायर करून सलामी दिली गेली. सेनेने तिरंगा वडील तानाजी चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. वडील तानाजी चव्हाण यांनी पार्थिवास मुखाग्नीग्न दिला.
यावेळी रोमित यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या होत्या.अनेकांना हुंदके अनावर झाले होते. यावेळी सरपंच उत्तम गावडे, माजी सरपंच उदयसिंह पाटील, जितेंद्र पाटील, विकास पाटील, निवास पाटील, विठ्ठल पाटील, शुभम बांडे, मधुकर पाटील, संग्राम पाटील, अजित बारवडे, संजय पाटील, बाळासाहेब पाटील, विजय पाटील, मेघाताई पाटील, जयश्री पाटील, संध्या पाटील, सुप्रिया देसाई, छायादेवी बारवडे, अरुण गावडे, रमेश पाटील, सुनील चौगले यांच्यासह गावातील सर्व सामजिक कार्यकर्ते, युवक मंडळे, प्रशासकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्यासह ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
वाळवा तालुका रोमित यांचे बलिदान कधीच विसरणार नाही. त्यांना आलेले वीर मरण हे अभिमानस्पद असले. तरी त्यांच्या कुटूंबावर कोसळलेले दुःख हे फार मोठे आहे. वारणा खोऱयातील या जवानाने आपल्या प्राणांची पर्वा न करता देश सेवेसाठी आपले बलिदान दिले. वारणा काठची परंपरा शूरत्वाची, वीरत्वाची आहे. याच परंपरेशी नाते सांगणारा शहिद रोमित चव्हाण लहानपणापासूनच सैन्यामध्ये भरती होण्यासाठी स्वप्न बाळगून होता. बारावी झाल्यानंतर वयाच्या 18 व्या वर्षी त्यांचे स्वप्न पूर्ण झाले व तो सैन्यामध्ये भरती झाला. जम्मू काश्मीरमध्ये आतंकवाद्यांच्या चकमकीत त्यांना वीरमरण आले. शहिद रोमित यांच्या कुटुंबियांना हा बसलेला धक्का न पेलवणारा आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या या शोककाळात आम्ही सर्वजण त्यांच्या दुखःत सहभागी, अशा शब्दात पालकमंत्री जयंत पाटील यांनी श्रध्दांजली अर्पण केली.