गोव्यात एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात सापडलेल्या तीनही कोरोना रूग्णांचे योग्य उपचारानंतर अहवाल निगेटिव्ह आले आणि त्यांना दवाखान्यातून सोडल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी राज्य कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली आहे. या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करतानाच कोरोनाची लढाई संपलेली नाही याची जाणीव गोव्यातीलच नव्हे तर देशातील जनतेने ठेवणे गरजेचे आहे आणि त्यामुळेच आता आपण सुटलो अशी भावना कोणाचीही झाली तरी प्रदीर्घकाळ आपणास काही सावधच रहावे लागणार आहे. विशेष म्हणजे सोमवारपासून सरकारने विविध क्षेत्रांमध्ये नियम शिथिल केले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्याचे अर्थचक्र सुरू व्हावे यासाठी कोरोनाची अत्यल्प बाधा झालेल्या झोनमध्ये उद्योगधंदे सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. अगदी मुंबईच्या कोरोना प्रभावित नसलेल्या काही भागांमधील बांधकामांची कामेही सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या दिलासादायक घोषणा होत असतानाच हा फक्त भुलभुलैय्या आहे असे वाटणाऱया अनेक घटना समोर येत आहेत. विशेष करून मुंबईत 12 तासात पावणे दोनशेने वाढलेली रूग्णसंख्या असो किंवा सांगली सारख्या 26 कोरोना रूग्ण खडखडीत बरे झालेल्या जिल्हय़ात सव काही सुरळीत सुरू आहे असे समजून उद्योगधंदे सुरू करण्याची तयारी सुरू असताना कोणाही रूग्णाशी थेट संपर्क आल्याची माहिती नसलेल्या एखाद्या बँक कर्मचाऱयाला कोरोनाची लागण होऊन त्याचा झालेला मृत्यू असो अशा घटनांनी हे संकट टळलेले नाही हे पुन्हा पुन्हा अधोरेखित होते आहे. दुर्दैवाने आपण त्याकडे किती गांभिर्याने पाहतोय? असा प्रश्नच पडतो. नाशिकसारख्या शहरात एक रूग्ण अनेक दिवस खासगी दवाखान्यात उपचार घेत होता आणि त्याचा मृत्यू झाला म्हणून उपचार करणारे डॉक्टर आणि रूग्णाशी संबंधित व्यक्तींवर कोरोनाची माहिती लपविल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईतून कंटेनरमधून बसून तेलंगणाकडे चाललेले 30 कामगार कोल्हापूरच्या जिल्हा पोलीस प्रमुखांनी तपासले आणि त्यात काहींना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. पुणे-बेंगलोर महामार्गावर प्रत्येक तपासणी नाक्यावर असे चोरून प्रवास करणारे लोक वारंवार सापडत आहेत. तर शासनाची परवानगी घेऊन रूग्णांना घेऊन जाणाऱयांचा गैरफायदा घेऊन पैसे दिले तर घरीच स्थानबध्द राहण्याचे शिक्के मारणार नाही असे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सुचविणारे महाभागही शासकीय सेवेत आहेत. अशांच्यामुळे कोरोना बाधित कोण आणि कोरोनामुळे लुबाडलेला कोण हे शोधून काढणे मुश्किल झालेले आहे. गुजरातमध्ये मृत्यू पावलेल्या धर्मगुरूचे अंत्यदर्शन घेण्यासाठी तपासणी नाके चुकवून दादरा नगर हवेलीच्या केंद्रशासित भागाच्या सीमेवरच्या जंगलातून प्रवास करणाऱया दोघा साधुंना पोरं पळवणाऱया टोळीतले समजून पालघर जिल्हय़ातील शंभर लोकांनी ठेचून मारल्याची घटनाही याच काळात घडली आहे. यातून राजकारण पेटले आहे ते वेगळेच. पण, एकाच संकटाचे हे असे अनेक कंगोरे दिवसेंदिवस समोर येताना दिसत आहेत. अशा काळात औरंगाबदच्या कोरोनाग्रस्त गरोदर महिलेला झालेल्या बाळाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला याचा आनंद मानायच्या आत समाजाच्या कानावर वाईटात वाईट बातमी येऊन आपटते आहे. हे धक्के पचवून जगायची लढाई करायची वेळ आलेली आहे. अशा काळात आपण कोरोनातून मुक्त झालो असे गोवा किंवा जगातील कोणताही भाग छातीठोकपणे म्हणू शकत नाही. पण, तरीही दिलासा म्हणून या गोष्टी समाज मान्य करत चालला आहे. याचे कारण, रूतलेले चक्र कुठेतरी फिरताना दिसले पाहिजे, लोकांना स्थिती बदलते आहे असे किमान वाटले पाहिजे आणि त्यामुळे सामाजिक शांतता रहावी हा त्यामागचा हेतू असतो. पण, त्यात धोकेही लपलेले आहेत. सोमवारपासून अनेक ठिकाणेचे उद्योग सुरू होताच रस्त्यांवर मोठी गर्दी दिसू लागली आहे. त्याचे हिडीस रूप मुंबईसारख्या शहरातील टोलनाक्यांवर दिसू लगेचच दिसू लागले आहे. अनेक ठिकाणी टोल नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. शासकीय कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील लोक आणि विविध कारणांसाठी प्रवासाची परवानगी मिळालेल्यांची ही गर्दी आहे असे मानले तरी कोरोना या सर्वांपासून फार अंतर दूर नाही याची जाणीवही आपणास ठेवावी लागणार आहे. लॉकडाऊन शिथिल केलेल्या अनेक देशांमध्ये जे प्रश्न निर्माण झाले ते महाराष्ट्रात किंवा भारताच्या अन्य कुठल्याही भागात होणारच नाही असे मानायचे का? सत्य माहिती असताना अशा घटनांकडे होणारी डोळेझाक आपण कशी समजून घ्यायची? पण, कृषी, उद्योग, आरोग्य सेवांची गरज भागविण्यासाठी, लोकांच्या हाताला काम देण्यासाठी सरकारने अशा प्रकारची जोखीम पत्करलेली आपण पाहतो आहोत. त्याचवेळी शेजारच्या कर्नाटक राज्यातल्या सरकारने माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा नातू आणि माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा पुत्राच्या शाही लग्नाला उपस्थित रहायला लोकांना पास मंजूर करून दिले. तिथल्या गर्दीचे फोटो व्हायरल होत असतानाच बुलडाणा जिल्हय़ात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आपली मुलगी आणि मुलाच्या लग्नाच्या 50 हजार पत्रिका रद्द करून अवघ्या 16 लोकांच्या उपस्थितीत सोहळा पार पाडला. या विरोधाभासाला तरी कसे समजून घ्यायचे? असा प्रश्न पडतो. संपूर्ण जगाने लॉकडाऊन स्विकारला त्याचे कारण जगात कुणाकडेच कोरोनावर मात करणारे खात्रीचे औषध अद्याप उपलब्ध नाही आणि प्रयोग यशस्वी होऊन ते प्रत्यक्ष बाजारात यायला प्रदीर्घ काळ लागणार आहे. तोपर्यंत वेळ काढता यावा म्हणून लोकांना परस्परांच्या संपर्कात येऊ न देण्याची काळजी जगभर घेतली जात आहे. पण, हा काही अंतिम उपाय नव्हे. काही ना काही कारणाने लोक परस्परांच्या संपर्कात येत आहेत. त्या सर्वांची तपासणी होऊ शकत नसल्याने नेमका कोरोनाचा वाहक कोण आहे हे उघडय़ा डोळय़ांनी शोधणे मुश्किल बनलेले आहे. लॉकडाऊन म्हणजे अशी यंत्रणा सक्षम करण्यासाठी घेतलेला वेळ आहे. पण, तो वेळ केंद्र सरकार वाया घालवते आहे असे दिसत आहे. त्यात राज्य सरकारांनी संकटात भर घालणाऱया गर्दीला निमित्त दिले तर परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. शिथिलतेची आणि मुक्तीची घोषणा करणाऱयांनी या धोक्याला टाळण्याची काय तजविज केलेली आहे?
Previous Articleभिलवडीतील खंडीत विज पुरवठा अखेर सुरळीत
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.