आंदोलनाला यश, बहुजन मुक्ती पार्टीचा दावा
सावंतवाडी:
शिधापत्रिकेत समाविष्ट असलेल्या व्यक्तींच्या नावे गॅस जोडणी असल्यास शिधापत्रिका रद्द करण्यात येईल, अशा हमीपत्राची अट घालून अनेक शिधापत्रिका रद्द करण्याचा शासनाचा घाट होता. मात्र, याप्रश्नी बहुजन मुक्ती पार्टीने राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला होता. दोन एप्रिलला प्रत्येक तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यासंदर्भात निवेदन दिले होते. शासनाने याची दखल घेत एक एप्रिलपासून शासन परिपत्रकान्वये अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहिमेला स्थगिती दिल्याने आंदोलनाला यश आल्याची माहिती बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष लाडू जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शासनाने मार्चपासून अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहीम हाती घेतली. रेशन दुकानदारांकडून शिधापत्रिकाधारकांना नमुना फॉर्म देण्यात आले. गॅस जोडणी असल्यास शिधापत्रिका रद्द करण्यात येईल, असे हमीपत्र लिहून घेण्यात येत आहे. आज जवळपास प्रत्येकाच्या घरात गॅस जोडणी आहे. गरिबांना शासनाने उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस जोडणी देऊन त्यांच्या शिधापत्रिकेवर गॅस असल्याचा शिक्का मारलेला आहे. या अटीमुळे अनेकांच्या शिधापत्रिका तपासणी मोहिमेत रद्द केल्या जाणार होत्या. त्याची दखल घेत बहुजन मुक्ती पार्टीने राज्यात हमीपत्र दहन आंदोलन सुरू केले. पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिसाळ-पाटील यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन लक्ष वेधले होते. ही अट रद्द व्हावी, यासाठी दोन एप्रिलपासून राज्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. शासनाने दखल घेऊन अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहिमेला 1 एप्रिल 2021 च्या आदेशान्वये पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत स्थगिती देण्यात आल्याचे जाहीर केले. त्यामुळे आंदोलनाला यश आल्याचे जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.