आधीच व्यग्र असलेल्या दलावर अतिरिक्त ताण
प्रतिनिधी /बेळगाव
हिजाबवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन आठवडय़ांपासून पोलीस यंत्रणा बंदोबस्ताच्या कामात व्यग्र असतानाच शिमोगा येथे घडलेल्या कार्यकर्त्याच्या हत्येमुळे पोलीस दलावरील ताण आणखी वाढला आहे. बेळगावातही खबरदारी घेण्यात आली असून खास करून सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱयांवर लक्ष ठेवण्यात आले आहे.
हिजाबवरून सुरू झालेल्या वादामुळे रोज सकाळी अधिकारी व पोलिसांना वेगवेगळय़ा शाळा-कॉलेजसमोर बंदोबस्त ठेवावा लागत आहे. कॉलेज सुटेपर्यंत पोलीस शिक्षण संस्थेबाहेर तळ ठोकून असतात. वरिष्ट अधिकारी सतत फेरफटका मारत परिस्थितीवर लक्ष ठेवून असतात. हे पोलीस व अधिकाऱयांचा नित्यक्रमच बनला आहे.
शाळा-कॉलेजच्या मुलांमध्ये संघर्ष होऊ नये, समाजमनावर त्याचे विपरित परिणाम होऊ नयेत, यासाठी सरकारी आदेशाचे पालन करतानाच सामाजिक भान लक्षात घेऊन पोलीस यंत्रणा कार्यरत आहे. शिमोगा येथे झालेल्या हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले असून गृहमंत्र्यांच्या जिल्हय़ात तणावाची स्थिती आहे.
तणावाच्या पार्श्वभूमीवर बेळगावसह संपूर्ण राज्यात खबरदारी घेण्यात आली आहे. बेळगाव येथेही पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. खासकरून संवेदनशील भागातील घडामोडींवर लक्ष ठेवण्यात आले असून सोशल मीडियावर अफवा पसरवून सामाजिक शांततेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करणाऱया व्यक्ती व संघटनांच्या कारवायांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आहे.
यासंबंधी ‘तरुण भारत’ने पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांच्याशी संपर्क साधला असता हिजाबवरून सुरू झालेला वाद व सोमवारी शिमोगा येथे घडलेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात आली आहे. अधिकाऱयांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली असून गस्त वाढविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दोघा जणांवर एफआयआर
सोशल मिडियावर प्रक्षोभक पोस्ट टाकणाऱया दोघा जणांवर येथील मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून सामाजिक शांततेला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न करणाऱयांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.