प्रतिनिधी/कोल्हापूर
सोलापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची प्रक्रिया सुरु झाली आहे. याचा बायपास मार्ग शिये ते पडवळवाडी मार्गावरील नऊ गावातून जाणार आहे. यामुळे येथील 400हूनअधिक शेतकर्यांची 300 एकर बागायत जमीन संपादीत होणार असल्याने शेतकरी उध्वस्त होणार आहे. यामुळे या मार्गाला विरोध असल्याचे निवेदन सोमवारी खासदार संजय मंडलिक व माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ व शेतकर्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिले. तरीही बळजबरीने काम सुरु केल्यास रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा नरके यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार मंडलिक व चंद्रदीप नरके यांनी जिल्हाधिकारी रेखावार यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समिती सभापती कोमल मिसाळ, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, बाजीराव पाटील, ऍड. माणिक शिंदे, कृष्णात पोवार, देवा पाटील, अभिजीत पाटील, विक्रम पाटील, सचिन चौगुले आदी ग्रामस्थांसह अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प अधिकारी वसंत पंदरकर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे आदी उपस्थित होते.
चंद्रदीप नरके म्हणाले, सोलापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचा बायपास मार्ग ssकरवीर तालुक्यातील शिये, जठारवाडी, भुये, भुयेवाडी, निगवे दुमाला, कुशिरे, केर्ली, केर्ले, पडवळवाडी या गावातून जात आहे. हा मार्ग झाला तर या गावांमधील सुपीक जमिनींसह घरे, नळ पाणी पुरवठा योजना, औद्योगिक क्षेत्रे यामध्ये जाणार आहेत. तसेच बहुतांश शेतकरी हे अल्पभूधारक असल्याने ते भूमीहीन होणार आहेत. त्यामुळे हा मार्ग रद्द करुन त्या ऐवजी वाठार ते बोरपाडळेमार्गे करावा. येथील शेतकर्यांच्या भावना तीव्र जिल्हाधिकार्यांनी त्या शासनाला कळवाव्यात. तरीही मोजणी सुरु केल्यास रस्त्यावर उतरु.
खा. मंडलिक म्हणाले, हा बायपास मार्ग नको म्हणून 2016पासून पाठपुरावा सुरु आहे. यासंदर्भात केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन हा बायपास मार्ग पर्यायी वाठारमार्गे करावा, असा प्रस्ताव दिला आहे. आमचा विकासाला विरोध नाही. परंतु यापूर्वीच येथील शेतकर्यांच्या जमिनी `एमआयडीसी’साठी गेल्या आहेत. त्यामुळे या मार्गाला येथील शेतकर्यांचा विरोध असून जिल्हाधिकार्यांनी या रस्त्याऐवजी पर्यायी रस्त्याचा प्रस्ताव शासनाला पाठवावा.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, शेतकर्यांनी घाबरुन जाऊ नये. अजून वेळ गेलेली नाही. कोणावरही जबरदस्ती केली जाणार नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकार्यांनी जर या मार्गाची असाईंनमेंट चुकीची केली असेल तर ते गंभीर आहे. ते त्यांच्यासाठी त्रासदायक होईल.
शेतकरी संघटनेचे ऍड. माणिक शिंदे म्हणाले, शिये, भुये या गावांमध्ये पुराचे पाणी येत असल्याने येथून हा मार्ग झाल्यास धोका वाढणार आहे. तसेच या भागातून कोल्हापूर व वैभववाडी रेल्वेमार्ग ही प्रस्तावित आहे.
मार्ग नको म्हणून केंद्रीय मंत्री गडकरींना निवेदन
शेतकर्यांचे नुकसान होणारा शिये ते पडवळवाडी बायपास मार्ग करु नये, यासाठी यापूर्वी खासदार संभाजीराजे छत्रपती व खासदार संजय मंडलिक यांनी केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरींना निवेदन दिले आहे. तसेच माजी खासदार राजू शेट्टी यांनीही या मार्गाला विरोध केला आहे, असे माजी आमदार नरके यांनी सांगितले.
लोकप्रतिनीधींचा अवमान केल्याचे पत्र पंदरकरांना देऊ
शिये-पडवळवाडी या बायपास मार्गाऐवजी पर्यायी वाठारमार्गे तो करावा, असा प्रस्ताव देऊनही आपल्या विभागाकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. उलट या मार्गाबाबतच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करुन थेट अधिसुचना काढल्या आहेत. यासाठी यापूर्वी झालेल्या लोकप्रतिनिधींच्या बैठकींचा संदर्भ देऊन यावेळी उपस्थित असलेल्या तत्कालिन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खा. संभाजीराजे, आमदार विनय कोरे आदींचा अवमान करता काय? त्यांच्यासह आपलाही अवमान केल्याबद्दल तुम्हाला पत्र पाठवू, अशा शब्दात चंद्रदीप नरके यांनी प्रकल्प अधिकारी पंदरकर यांना धारेवर धरले.