प्रतिनिधी/ रत्नागिरी
महाराष्ट्र राज्याच्या कोकण विभागातील अनुसूचित जाती समूहातील लोकांच्या अन्नसुरक्षा आणि त्यांचे ग्रामीण जीवन उंचावण्यासाठी मत्स्यसंवर्धन तंत्रज्ञान आधारित संशोधन आणि विकास पथदर्शी प्रकल्प राष्ट्रीय पातळीवर सादर झाला होता. त्या मत्स्य महाविद्यालय शिरगांव, रत्नागिरी येथील प्रकल्पाला 1 कोटी 78 लाख मंजूर झाले असून राज्यातील कृषी विद्यापीठातील अशा प्रकारचा पहिलाच संशोधन प्रकल्प आहे.
मत्स्य महाविद्यालय, शिरगांव रत्नागिरी येथील प्रा. डॉ. बी. आर. चव्हाण यांना राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धात्मक संशोधन प्रकल्प मंजूर झाला आहे. राज्याला गोडे, निमखारे आणि खारे पाणी असे तिन्ही प्रकारचे जलस्त्रोत उपलब्ध आहेत. या नैसर्गिक संपत्तीचे सुयोग्य नियोजन करून मत्स्य व्यवसायाद्वारे उत्पादन वाढवून निलक्रांती घडवणे, या उद्देशाने विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार यांच्याकडे ‘महाराष्ट्र राज्याच्या कोकण विभागातील अनुसूंिचत जाती समुहातील लोकांच्या अन्नसुरक्षा आणि त्यांचे ग्रामीण जीवन उंचावण्यासाठी मत्स्यसंवर्धन तंत्रज्ञान आधारित ‘संशोधन आणि विकास पथदर्शी प्रकल्प’ राष्ट्रीय पातळीवर सादर करण्यात आला होता.
या प्रकल्पांतर्गत जलाशयात पिंजऱयात मत्स्य संवर्धन तंत्रज्ञान आणि बायोफ्लॉक तंत्रज्ञान वापरून शास्त्रीय पध्दतीने मत्स्य संवर्धन करण्यात येणार आहे. प्रकल्प तीन वर्षांसाठी 2021-22 पासून कुलगुरू डॉ. सजय सावंत आणि संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे आणि शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे, मत्स्य विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिंगारे आणि विभागप्रमुख सुरेश नाईक याच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पप्रमुख डॉ. बी.आर. चव्हाण यांच्यामार्फत राबवला जाणार आहे. या प्रकल्पामध्ये कृषी विज्ञान केंद्र लांजा यांचे डॉ. हणमंते, डॉ. संदीप पाटील, मत्स्य महाविद्यालयाचे डॉ. राहुल सदावर्ते, डॉ. हरीष धमगाये हे प्रकल्प प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत.
दुर्लक्षित जलाशयात लोकसमुदायातून मत्स्य संवर्धनास चालना
राज्यात नैसर्गिक तलाव, तळी, पाझर तलाव, पाटबंधारे तलावांचे क्षेत्र 3.0 हेक्टर व नद्यांचे जलक्षेत्र 19000 कि.मी. आहे. यापैकी काही जलक्षेत्र मत्स्य संवर्धनाच्या दृष्टीने दुर्लक्षित आहेत. तर उर्वरित जलक्षेत्रातून मिळणारे मत्स्योत्पादन खूपच कमी आहे. अशा दुर्लक्षित जलस्त्रोत किंवा जलाशयात शास्त्रीय पध्दतीने मत्स्य संवर्धन केले तर राज्याच्या मत्स्योत्पादनात मोठय़ा प्रमाणात वाढ होईल. त्याद्वारे ग्रामीण युवकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील. ग्रामीण युवकांनी अशा दुर्लक्षित जलाशयात लोकसमुदायातून मत्स्य संवर्धन केले तर त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढून ग्रामीण जीवन उंचावण्यास मदत होणार आहे.