पिण्याच्या पाण्यासाठी स्वखर्चाने टँकर मागवण्याची ग्रामस्थांवर वेळ
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरानजीक असलेल्या शिरगांव ग्रामपंचायत हद्दीतील स्वरुपानंद नगरमधील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची व्यथा दूर होण्याचे नाव नाही. एमआयडीसी परिसरातील कारखाने, सोसायटी येथील सांडपाण्यामुळे या नगरातील विहिरीतील पाणी दुषित बनले आहे. त्यामुळे स्वखर्चाने पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मागवण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे.
स्वरुपानंद नगर या परिसरात असलेल्या फिशमील व वसलेल्या सोसायटय़ांमधील सांडपाणी नाल्याद्वारे सोडले जात आहे. हे सांडपाणी स्वरूपानंद नगर मार्गे पुढे अगदी शिरगाव तिवंडेवाडीकडे जाते. त्यामुळे या नाल्यालगत असलेल्या रहिवाशांच्या असलेल्या 17 ते 18 पिण्याच्या पाणी विहिरी दुषित बनलेल्या असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या 5 वर्षापासून इथल्या ग्रामस्थांची ही समस्या भेडसावत आहे. पण प्रशासनाकडून याकडे गांभिर्यानं लक्ष दिलं जात नसल्याची कैफियत ग्रामस्थांकडून मांडली जात आहे.
शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत स्वरूपानंद नगर वसले आहे. मात्र याच ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांना दुषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आरोय्ग्नााच्या समस्या निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. वारंवार यासंदर्भात ग्रामपंचायतीकडे तक्रार करण्यात आली होता.r परंतु ग्रामंपचायतीमार्फत ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पुरवला जाणारा टँकर 8 ते 10 दिवसांनी येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. येथील कुटुंबांची संख्या मोठी असल्याने पाठवले जाणारे 2 हजार लिटरचे पाणी कोणाला पुरणार, हा प्रश्न उभा राहत आहे. त्यामुळे ग्रामस्थच आता स्वखर्चाने टँकर मागवून पाण्याची तहान भागवत आहेत. याकडे शिरगाव ग्रामपंचायतींने कटाक्षाने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.