सर्व पक्षीय शेतकरी समन्वय समिती शिराळा यांचे नव्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन
प्रतिनिधी / शिराळा
दिल्ली येथे सूरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर लादलेल्या जुलमी कायद्याला विरोध करण्यासाठी शिराळा तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. सर्व पक्षीय शेतकरी समन्वय समितीने तहसीलदार गणेश शिंदे यांना याबाबतचे निवेदन दिले. यावेळी प्रशिक्षणार्थी भाप्रसे अधिकारी आरोशी सिंग उपस्थित होत्या.
सदरचे लाक्षणिक धरणे आंदोलन, शेतकरी समन्वय समिती शिराळा तालुका यांच्यावतीने करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, शिराळा तालुका कामगार परिषद, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य, श्रमिक मुक्ती दल (लोकशाहीवादी) आदी संघटना आणि पक्ष सहभागी झाले.
शेतकऱ्यांवर अन्याय करणारे, शेतकऱ्याला उध्वस्त करणारे, तीनही कायदे मागे घेण्यात यावेत. घरगुती गॅस दरवाढ आणि पेट्रोल डिझेल मध्ये होत असेल दरवाढ मागे घ्यावी.शेतकऱ्याच्या मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या नवीन कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला योग्य दर मिळण्याची हमी नाही. नवीन कृषी कायद्यांनी बाजार समिती उध्वस्त होणार आहेत. यामुळे शेतकरी देखील उद्ध्वस्त होऊन भांडवलदार शिरजोर होणार आहे. अन्यायकारक तिन्ही कायदे रद्द केले पाहिजेत. वीज वितरण केंद्र सरकारचे धोरण शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहे. मक्तेदारी शेती पद्धतीने शेती पूर्णतः नष्ट होणार आहे. असे सदर निवेदनात म्हटले आहे.