लाठीचार्ज व अटकप्रकरणी दीपक ढवळीकरांकडून निषेध
प्रतिनिधी / फोंडा
शिरोडय़ात कोविड निगा केंद्र उभारण्यापूर्वी सरकारने स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच हा निर्णय घ्यायला हवा होता. स्थानिक आमदारांना येथील परिस्थिती हाताळण्यास अपयश आले. विरोध करणाऱया निरापराध लोकांना मात्र तरुंगात डांबण्यात आले, अशी टिका करीत शिरोडय़ात जमावर झालेला लाठीचार्ज व अटक प्रकरणी माजी मंत्री तथा म. गो. पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी निषेध केला आहे.
फोंडा येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिरोडय़ातील जिल्हा पंचायत उमेदवार मानुएल क्रूझ व पंचसदस्य हरी नाईक हे उपस्थित होते. कोरोनाबाबत गोवा ग्रीन झोन जाहीर करुन राज्य सरकार बेफिकीर राहिले. येणाऱया संकटाला तोंड देण्यासाठी कुठलेही ठोस नियोजन नसल्याने आज रुग्णसंख्या आटोक्याबाहेर पोचली आहे. ज्या मांगोरहिल-वास्को भागात मोठय़ासंख्येने कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले त्यांच्या उपचाराची व्यवस्था वास्को भागातच करणे शक्य होते. चिखली येथील कोविड इस्पितळात जागा अपुरी पडत असल्यास वास्कोतील टिळक मैदानावर कोविड निगा केंद्र उभारता आले असते. शिवाय कुंकळय़े येथील बंद असलेले खासगी इस्पितळ सरकारला ताब्यात घेता आले असते. हे सर्व पर्याय सोडून शिरोडासारख्या ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात कोविड निगा केंद्र उभारल्याने लोकांमध्ये भिती पसरणे साहजिकच आहे. हे केंद्र सुरु करण्यापूर्वी निदान स्थानिकांच्या सूचना लक्षात घ्यायला हव्या होत्या. पण विरोध करणाऱयांवर पोलीस बळाचा वापर करुन त्यांना तरुंगात टाकणे हा कुठला न्याय आहे ? असा प्रश्न ढवळीकर यांनी उपस्थित केला. शिरोडय़ात स्थानिक लोकांविरुद्ध रचलेले हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला.
भाजपाला सर्व गोष्टींमध्ये राजकारण दिसते
शिरोडय़ातील विरोध हा राजकीय हेतुने प्रेरीत असल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. भाजपा व तेथील स्थानिक आमदारांना सर्व गोष्टीमध्ये राजकारणच दिसते, असे ते म्हणाले. वास्को भागात ज्या झपाटय़ाने रुग्ण वाढत आहेत, ते पाहता वास्को भाग यापूर्वीच लॉकडाऊन व्हायला हवा होता. लॉकडाऊनचे तीन महिने सरकार सुस्त राहिले. या काळात कोरोनावर मात करण्यासाठी पुढील सहा महिन्यांचे नियोजन करायला पुरेशी वेळ होती. आता रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढल्याने सरकार खडबडून जागे झाले आहे. यापुढे कोरोनाचे वाढते हे संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी सर्व व्यवहार बंद करुन केवळ कोरोना निवारणावर लक्ष केंद्रित करावे लागेल. गोव्यातील जनता सुजाण आहे. ज्या भागात रुग्ण आढळले तेथे ग्रामस्थांनीच पुढाकार घेऊन स्वयंस्फूर्तीने व्यवहार बंद ठेवले. जनतेला हे कळू शकते, मग सरकारला का कळू नये. आत्तापर्यत जनता सरकारचे ऐकत आली आहे, आता सरकारने जनतेचा सल्ला ऐकून घेण्याची वेळी आली आहे, असेही दीपक ढवळीकर म्हणाले.
उद्घाटनांची घाई कशाला…?
कोरोना लॉकडाऊनच्या काळात सरकारला जनतेच्या आरोग्यापेक्षा रस्त्यांच्या हॉटमिक्स डांबरीकरणाची व प्रकल्पांच्या उद्घाटनाची घाई झाली आहे. प्रियोळ मतदार संघात रविवारी ज्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन झाले तो प्रकल्प, तसेच बाणस्तारी मार्केट प्रकल्प, माशेल कदंब बस्थानक प्रकल्प या सर्व प्रकल्पांचे काम आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात झाले होते. आज भलतेच लोक त्याचे श्रेय लाटत असल्याची टिकाही त्यांनी केली.