कृषी विधेयकांवरून मोदी सरकारवर नाराजी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कृषी विधेयकावरुन नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात असणाऱया रालोआमध्ये बंडखोरी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱयांची ही नाराजी पाहता भाजपचा जुना पक्ष शिरोमणी अकाली दलाने केंद्र सरकारशी संबंध तोडला आहे. केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी गुरुवारी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हा राजीनामा स्वीकारला आहे.
शिरोमणी अकाली दल केंद्रातून बाहेर पडल्यानंतर आता हरियाणामध्ये भाजपचा सहकारी पक्ष जननायक जनता पार्टी (जेजेपी) वर दबाव वाढत चालला आहे. शेतकऱयांच्या नाराजीमुळे जेजेपीचे प्रमुख उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला सध्या चांगलेच गोंधळात अडकले आहेत. हरियाणामध्ये भाजप-जेजपी युतीचे सरकार आहे. हरियाणाचे शेतकरी कृषी विधेयकाविरोधात आंदोलन करत आहेत. प्रत्येक गावातील शेतकऱयांनी पंचायती करत या विधेयकाला विरोध दर्शवला आहे. यावरून शेतकऱयांमध्ये रोष वाढत असल्याचे दिसून येत आहे.
शेतकऱयांची नाराजी पाहून जेजेपीच्या आमदारांमध्ये बंडखोरीची ठिणगी पडली आहे. जेजेपीचे आमदार रामकुमार गौतम यांनी यापूर्वीच उपमुख्यमंत्र्यांविरोधात वक्तव्य करत होते. आता टोहानाचे आमदार देवेंद्रसिंग बबली यांनीही शेतकऱयांच्या प्रश्नासंदर्भा दुष्यंत चौटाला यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे.
हरियाणात जेजेपी-भाजप युती सरकार
हरियाणामध्ये मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्त्वात सरकार जेजेपीच्या पाठिंब्याने स्थापन केले आहे. चौधरी देवीलाल हे शेतकरी नेते म्हणून देशात ओळखले जातात. जेजेपीचा राजकीय आधार ग्रामीण भाग आणि शेतकऱयांवर अवलंबून असल्याने शेतकऱयांची नाराजी आणि राजकीय नुकसान पाहता जेजेपीने लाठीचार्ज केल्यानंतर शेतकऱयांची माफी मागितली आहे. शेतकऱयांवर लाठीचार्ज केल्याबद्दल जेजेपी माफी मागते. जेजेपी नेहमीच शेतकऱयांच्या पाठीशी आहे. त्याचे हित पक्षाचे प्राधान्य असल्याचे दुष्यंत चौटाला यांचे लहान भाऊ दिग्विजय चौटाला यांनी म्हटले होते. जेजेपीचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला हे कृषी विधेयकाच्या समर्थनात आहेत.