25 वर्षांनी दोन्ही पक्षांमध्ये आघाडी -पंजाबमध्ये बसप 20 जागा लढविणार
वृत्तसंस्था / चंदिगड
पंजाबमध्ये 2022 मध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे आणि आघाडी निर्माण करण्यास सुरुवात झाली आहे. मायावती यांचा बसप आणि प्रकाशसिंग बादल यांचा शिरोमणी अकाली दल आता एकत्र आले आहेत. शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल आणि बसप नेते सतीश मिश्रा यांनी शनिवारी यासंबंधी घोषणा केली आहे. दोन्ही पक्ष एकत्रितपणे पंजाब विधानसभा निवडणूक लढविणार आहेत. तिन्ही कृषी कायद्यांवरून भाजपसोबतची आघाडी संपुष्टात आल्यावर अकाली दलाने बसपसोबत 25 वर्षांनी आघाडी केली आहे.
पंजाबमधील एकूण 117 पैकी 20 मतदारसंघांमध्ये बसप निवडणूक लढविणार आहे. तर उर्वरित जागा अकाली दलाला मिळाल्या आहेत. पंजाबच्या राजकारणात हा ऐतिहासिक दिन आहे. अकाली दल आणि बसपची आघाडी राज्यातील सर्वात मोठी शक्ती ठरल्याचे उद्गरा मिश्रा यांनी काढले आहेत. 1986 मध्ये दोन्ही पक्षांनी आघाडी करत लोकसभा निवडणूक लढविली होती, तेव्हा या आघाडीला राज्यातील 13 पैकी 11 जागांवर विजय मिळाला होता.
बसपला मिळालेले मतदारसंघ
करतारपूर, जालंधर पश्चिम, जालंधर उत्तर, फगवाडा, होशियारपूर, टांडा, दसूहा, श्री चमकौर साहिब, बस्सी पठाणा, महिल कलां, नवांशहर, लुधियाना उत्तर, पठाणकोट, सुजानपूर, भोआ, श्री आनंदपूर साहिब, मोहाली, अमृतसर उत्तर, अमृतसर मध्य आणि पायल विधानसभा मतदारसंघ बसपच्या वाटय़ाला आले आहेत.
साथ सोडणार नाही
एखाद्याचा हात पकडल्यास त्याला कधीच सोडत नसल्याचा शिरोमणी अकाली दलाचा इतिहास राहिला आहे. प्रकाश सिंग बादल पाचवेळा मुख्यमंत्री झाले. त्यांच्या विचारसरणीमुळेच लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात. पंजाबमध्ये सुखसमृद्धी नांदावी हाच त्यांचा विचार आहे. दलित आणि शेतकऱयांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रकाश सिंग बादल यांनी अनेक योजना राबविल्या पण सध्याचे काँग्रेस सरकार या योजनांना पुढे नेऊ शकलेले नाही असे विधान सुखबीर यांनी केले आहे.
आम आदमी पक्ष लक्ष्य
या आघाडीची घोषणा करण्यासाठी मायावती येणार होत्या, पण कोराना संकटात गर्दी होऊ नये म्हणून त्या आल्या नाहीत. अकाली दल आणि बसपची विचारसरणी एकसारखीच आहे. तिन्ही कृषी कायद्यांना अकाली दलाप्रमाणे बसपनेही विरोध केला आहे. हरसिमरत बादलने शेतकऱयांच्या समर्थनार्थ स्वतःचे मंत्रिपदही सोडले आहे. उत्तरप्रदेशात बसपचे सरकार आल्यावर हे कायदे लागू होऊ देणार नसल्याचे मिश्रा यांनी सांगितले आहे. आम आदमी पक्षाने प्रथम तिन्ही कृषी कायद्यांना समर्थन दिले, पण शेतकऱयांचे आंदोलन पाहून घुमजाव केल्याची टीका त्यांनी केली आहे.