शिरोळ/प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांची आढावा बैठक तहसीलदार कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जागा अपुरी पडल्याच्या कारणाने तालुक्यातील लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. गोंधळ वाढू लागल्याने खासदार धैर्यशील माने यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन करीत होते. पण कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते अखेर ही बैठक गावावर घेण्याचे ठरविण्यात आले या गोंधळातच ही बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्यमंत्री राजेंद्र पाटील–यड्रावकर होते.
या बैठकीस जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे– धुमाळ यांच्यासह सर्वच विभागाचे अधिकारी उपस्थित होते
ऑगस्ट 2019 मध्ये आलेल्या महापुरामुळे शिरोळ तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, उद्योजक यांच्यासह अनेक घटकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यातील बऱ्याच घटकांना नुकसानीचे पंचनामे करून मदत दिली आहे. परंतु ज्यांचे प्रत्यक्ष नुकसान झाले आहे त्यांना शासनाची कोणतीही मदत मिळाली नाही.
बैठकीच्या प्रारंभीस खासदार धैर्यशील माने यांनी स्वागत करून जिल्हा परिषद प्रभाग वार पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु बैठकीची व्यवस्था अपुरी पडत असल्याने गोंधळाला सुरुवात झाली अखेर नामदार राजेंद्र पाटील–यड्रावकर यांनी गाववार बैठक घेण्याचे जाहीर केले.
शिरोळ तालुक्यातील महापुराने अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक लोकांना याचा लाभ मिळाला नसल्याचे निर्देशनास आणून दिले. महापुराने अनेकांची घरे पडली आहेत विहिरी मुजून गेलेल्या आहेत, विद्युत मोटारी जळलेल्या आहेत यासह अन्य व्यथा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व कार्यकर्त्यांनी मांडल्या व लेखी मागण्यांचे निवेदन यावेळी दिले.
यावेळी बोलताना राज्यमंत्री राजेंद्र पाटील–यड्रावकर म्हणाले की, येत्या पाच तारखेपर्यंत नव्याने आलेल्या प्रस्तावाचा विचार करून योग्य ते निर्णय घेऊन जास्तीत जास्त मदत करण्याची ग्वाही दिली. प्रामाणिक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने लवकरच मदत देण्याबाबत विचार सुरू आहे. सकारात्मक दृष्टिकोनातून शेतकऱ्या अर्थसाह्य करण्याचा शासनाचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले
या आढावा बैठकीस माजी आमदार उल्हास पाटील, पंचायत समितीच्या सभापती मिनाज जमादार, उपसभापती मल्लू खोत, मल्लाप्पा चौगुले, चंद्रकांत मोरे, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, जिप सदस्य अशोकराव माने यांच्यासह पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, तालुक्यातील विविध गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीस महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
महापुराच्या काळामध्ये तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले. परंतु काही गावातील नागरिकांनी स्थानिकांना हाता धरून संगणमत करून बोगस याद्या बनवून लाभ घेतल्याचा आरोपही केला.