रवींद्र केसरकर / कुरुंदवाड
शिरोळ तालुक्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच महापुराने थैमान घालत संपूर्ण तालुक्याला सळो कि पळो करून सोडले. त्यातून तालुका कसाबसा सावरत असतानाच मार्चच्या सुरुवातीपासूनच कोरोनाचे संकट येऊन थडकले आणि आर्थिक मंदीचे सावट शिरोळ तालुक्यावर घोंगावू लागलं.
ऑगस्ट 2019 मध्ये आलेल्या महापुरामुळे सुमारे दोन ते तीन महिने शिरोळ तालुक्यातील अनेक गावासह श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील आर्थिक व्यवहार ठप्प होते. या महापुरात अनेकाचे संसार उध्वस्त झाले. तर शेती, उद्योगांचे मोठे नुकसान झालं. या संकटातून सावरत असतानाच कोरोनाच महाभयंकर संकट जगाबरोबर भारताला आणि महाराष्ट्रातील सर्व लोकांना पण भेडसावू लागलं. याला शिरोळ तालुका ही अपवाद राहिला नाही.
यामुळे विषाणूला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. कोरोनाच्या महामारी मुळे बाजारपेठा ओस पडू लागल्या, मंदिरातील दर्शन बंद झाली, आठवडे बाजार बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल घरीच पडून राहिला शहरातले मोठे मॉल ओस पडले, शाळा कॉलेज व शासकीय कार्यालय बंद झाली आणि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे श्रीक्षेत्र नृसिंहवाडीला देखील फार मोठे नुकसान सोसावे लागत आहे. शासकीय आदेशानुसार भक्तांना मंदिरातील दर्शन बंद झाली,पुणे मुंबई व देशाच्या अन्य ठिकाणाहून येणारे भाविक थांबले. त्यामुळे येथील प्रसिद्ध असलेले पेढा बर्फी बासुंदी आदी मेवामिठाई विक्रीचा बंद झाल्यामुळे व हा नाशवंत पदार्थ असल्यामुळे त्याचे उत्पादन थांबले, येथे चालणारा हॉटेल व्यावसायिकांना मंगल कार्यालये व लॉज देखील व्यावसायिकांना बंद करावा लागला तसेच शिरोळ तालुक्यातील पोल्ट्री व्यवसाय देखील फार मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. यामुळे शिरोळ तालुक्यावर मंदी व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
शेतकऱ्याला भाजीपाला गावातच विकण्याची वेळ आली पण मनाजोगता भाव मिळत नसल्याने नुकसान होण्यापेक्षा बरे या उद्देशाने शेतकरी कमी भावाने का होईना भाजीपाला विकू लागला. तालुक्यातील साखर कारखाने व उद्योग बंद असल्याने यापुढेही मंदीला तोंड द्यावे लागणार आहे.