ऑनलाईन टीम / शिर्डी :
मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. विशेषतः महाराष्ट्रात तर चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डीमधील साई संस्थानने साई भक्तांना दर्शनासाठी पुन्हा एकदा नियम बदलले आहेत.
अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी नाईट कर्फ्यूची घोषणा केल्यामुळे पुन्हा एकदा शिर्डी देवस्थानने बदल केला आहे. आता नव्या नियमानुसार, आता सकाळी 6 ते रात्री 9 या वेळेतच साई भक्तांना दर्शन घेता येणार आहे. तर रात्री 9 ते सकाळी 6 या 9 तासांसाठी दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. हा निर्णय घेतल्याचं देवस्थानकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
त्याचसोबत सकाळची काकड आरती आणि रात्रीची शेज आरती भक्तांसाठी बंद असेल, गुरुवारची पालखी देखील बंद असेल, गुरुवार-शनिवार-रविवार आणि उत्सवाच्या दिवशी बायोमेट्रिक पास काऊंटर बंद ठेवण्यात येईल, असे काही निर्बंध गर्दी होऊ नये म्हणून लावण्यात आले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात वाढत असलेली रुग्ण संख्या लक्षात घेऊन अहमदनगरमध्ये देखील नाईट कर्फ्यू जारी करण्यात आला आहे.