पन्हाळा / प्रतिनिधी
पन्हाळा आणि व्हॉलिबॉल असे समिकरण घट्ट करणारे शिवछत्रपती पुरस्कार विजेते ज्येष्ठ व्हॉलिबॉल मार्गदर्शक दिलीप जोशी (वय ७२ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या ३५ वर्षापासून शाहु क्रिडा मंडळाच्या माध्यमातून ते व्हॉलिबॉल लोकप्रिय करण्यासाठी कार्यरत होते.
आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय व्हॉलिबॉल खेळाडू घडवले, सलग ३५ वर्षे पन्हाळगडावर व्हॉलिबॉल स्पर्धेचे यशस्वी आयोजनन करणा-या शाहू क्रीडा मंडळाचे ते सर्वेसर्वा होते. गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते. त्यांना उपचारासाठी पुण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथून काही दिवसापूर्वी त्यांना पन्हाळ्यावर आणले होते. आज सकाळी १ वाजता त्यांची प्राणज्योत मावळली.
पन्हाळ्यावरील सार्वजनिक कार्यक्रमात नेहमीच आघाडीवर असणारं नाव म्हणजे दिलीप जोशी, शाहू क्रीडामंडळाचे सचिव,शिवसंसकृती मंडळ,तसेच जाएंट ग्रुपचे अध्यक्ष,कोल्हापूर जिल्हा व्हॉलिबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष,पंच समितीचे निमंत्रक अशी अनेक पदे त्यांनी भुषवली होती.
१९८० मध्ये त्यानी कै.बाजीराव नलवडे, कै.बाळासाहेब भोसले , संभाजी गायकवाड, रमेश स्वामी यांच्या सहकार्याने पन्हाळ्यावर शाहु क्रिडा मंडळाची स्थापना केली. पोलंड वासियांनी पन्हाळ्यावर आणलेल्या व्हॉलिबॉलला पन्हाळ्यात रुजवण्याचं काम गेली ३५ वर्षे जोशी करत होते. जोशी यांच्या नेतृत्त्वाखाली शाहु क्रिडा मंडळाने पन्हाळगडावर ४ राष्ट्रीय, ३६ राज्यस्तरीय आणि ६ जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन केले. २१ राज्यस्तरीय व्हॉलिबॉल प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन करु आंतरराष्ट्रीय व्हॉलिबॉल मार्गदर्शकांना पन्हाळ्यावर आणून खेळाडूंना त्यांचे मार्गदर्शन उपलब्ध करुन दिले.
जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळ्यावरून ५० राष्ट्रीय १४५राज्यस्तरीय व्हॉलिबॉल खेळाडु तयार झाले. राष्ट्रीय स्तरावर चमकलेले अनेक खेळाडू सध्या विविध बॅंका, एलआयसी, एसटी, पोलिस, राज्य विदयुत मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत आहेत. आपल्या स्टेट बॅंकेतील निवृत्तीनंतर त्यांनी ‘कॅच देम यंग’ या उक्तीनुसार लहान मुलांना पन्हाळ्याच्या मयुर उदयानात खेळाचे शास्त्रशुध्द मार्गदर्शन सुरु केले. आपले संपूर्ण आयुष्यच व्हॉलिबॉल खेळास वाहून घेतलेल्या या कर्मयोग्याला राज्यस्तरीय गुणवंत पुरस्कार,जिल्हास्तरीय क्रीडाप्रसारक पुरस्कार, पन्हाळा भूषण, शासनाचा क्रीडासंघटक म्हणून शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.आज त्याच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,मुलगी,सुन,जावाई,नांतवडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी सकाळी 9:00 वाजता होणार आहे.