ऑनलाईन टीम / मुंबई :
यंदाही शिवजयंती सोहळयावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं सावट आहे. मात्र, या लाटेची दाहकता कमी असल्याने राज्य सरकारने येत्या शनिवारी पार पडणाऱया शिवजयंतीसाठी नियमावली जारी केली आहे.
राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीनुसार, शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडमध्ये 200 आणि जन्मोत्सव सोहळय़ासाठी 500 लोकांनाच उपस्थित राहता येईल. मात्र, कोरोना नियमांचे पालन करून सर्वांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळा साजरा करावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
येत्या शनिवारी (दि.19) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळय़ातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मान्यता दिली आहे. तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात येत आहेत. शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती वाहून आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योजी दौडीत दोनशे जणांना सहभागी होता येईल. तसेच शिव जन्मोत्सव सोहळय़ात पाचशे जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.