प्रकरणाची सखोल चौकशी करा : ग्रामस्थांची मागणी
प्रतिनिधी / धारबांदोडा
शिवडे धारबांदोडा भागात मुख्य जलवाहिनीला छिद्रे पाडून चोरटय़ा मार्गाने पाणी वळविण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर, या सर्व बेकायदेशीर जलवाहिन्या तोडण्याचे काम काल बुधवारपासून हाती घेण्यात आले आहे. या पाणी चोरी प्रकरणी सखोल चौकशी करतानाच दोषीविरुद्ध कारवाई करावी. तसेच शिवडे गावाला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी बदलून नवीन टाकण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शिवडे भागात गेल्या काही वर्षांपासून बेकायदेशीर मार्गाने पाणी वळवण्याचे हे प्रकार सुरु आहेत. पाणी विभागाच्या अभियंत्यांकडे त्यासंबंधी तक्रारी करूनही कोणतीच कारवाई होत नव्हती. अखेर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पाणी विभागाला उशिरा का होईना, पण कारवाई करावी लागली. मंगळवारच्या दिवशी एकूण चार ठिकाणी पाणी वळविण्याच्या जलवाहिन्या खोदून काढण्यात आल्या होत्या. बुधवारच्या दिवशीही या बेकायदेशीर वाहिन्या बंद करण्याचे काम हाती घेण्यात आले होते.
जलप्रकल्पाच्या मुख्य टाकीलाच चोरटी जलवाहिनी
शिवडे येथील 2 एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प 2008 सालापासून कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून धारबांदोडा ग्रामपंचायत व साकोर्डा ग्रामपंचायत क्षेत्रात पाणी पुरवठा केला जातो. धक्कादायक गोष्ट म्हणजे प्रकल्पाच्या मुख्य टाकीलाच बेकायदेशीररित्या जलवाहिनी जोडून पाणी चोरटय़ा मार्गाने वळविले जात होते. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारे मुख्य टाकीलाच जलवाहिनी जोडणे हे एकटय़ा दुकटय़ाचे काम नाही. प्रकल्प उभारतानाच ही जलवाहिनी जोडली गेली असावी. त्यामुळे पाण्याची टाकी भरल्यानंतर दोन ते तीन तासांतच ती खाली व्हायची. पावसाळय़ात मात्र पाणी पुरवठा सुरळीत असायचा. पाण्याच्या मुख्य टाकीलाच छिद्र पाडल्याने गावात अत्यंत कमी दाबाचा पुरवठा व्हायचा. या पाणी प्रकल्पाची क्षमता किमान आठ तास पाणी पुरवठा करण्याची असून गैरमार्गाने पाणी वळविण्याच्या प्रकारांमुळे ग्रामस्थांना पिण्यासाठीही व्यवस्थित पाणी मिळत नव्हते.
साहाय्यक अभियंता देविदास गावडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सध्या ज्या चोरटय़ा मार्गाने जलवाहिन्या जोडण्यात आल्या होत्या त्या बंद करण्याचे काम सुरु आहे. याशिवाय आणखी जलवाहिन्या जोडल्या आहेत का ? याचा तपासही सुरु आहे.