शिवरायांचे पादुकांचे प्रस्थान होणार, कोरोनामुळे पादुकांचा डोक्यावरुन प्रवास
प्रतिनिधी / सातारा
हिंदवी स्वराज्याची तिसरी राजधानी रायगडाहून भूवैकुंठ पंढरीतील विठोबाच्या भेटीस दरवर्षी जाणाऱया छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पालखीचे प्रस्थान नित्य प्रथेप्रमाणे ज्येष्ठ वद्य चतुर्थी, श्री राजाभिषेक शक 348, तद्नुसार यावर्षी सोमवार, दि. 28 जून 2021 रोजी सकाळी ठीक 9 वाजता रायगडावरील छत्रपती श्री शिवाजी महाराज समाधी मेघडंबरी पासून होणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या विपरीत परिस्थितीमुळे शिवरायांच्या पादुका चक्क डोक्यावर घेऊनच केवळ 5 शिवभक्त धारकरी रायगडवरुन पंढरीस जाणार आहेत, अशी माहिती सुमंत, श्रीमन्नृपशिवछत्रपती पालखी सोहळय़ाचे योगेश शिंदे यांनी दिली.
गेल्यावर्षीही कोरोनाच्या प्रकोपामुळे रायगडावरुन केवळ तीनच श्रद्धाळू शिवभक्त शिवरायांच्या पादुकांना घेऊन पंढरपूरला गेले होते. विनाकारण निर्माण केलेला कोरोनाचा भयकंप न बाळगता संपूर्णपणे सावधगिरी बाळगून, प्रलयंकारी महामारीतही धारकऱयांसह पालखी मार्गातील समाजस्वास्थ्याची अत्यावश्यक काळजी घेऊन, अजिबातच गर्दी न जमवता, मार्गातील अनावश्यक कोणासही पादुकांच्या प्रवासाची बित्तंबातमीही न लागता, पायी पालखी सोहळ्याची परंपरा अगदीच सुरक्षितपणे जपता येऊ शकतेच; याचा सर्वोत्तम आदर्श शिवरायांच्या याच पालखी सोहळ्याने गेल्या वर्षी घालून दिला होता. जगदीश्वराचे व शिर्काईचे दर्शन घेऊन राजसदर, रायगडाहून प्रस्थान केल्यानंतर छ. शिवरायांच्या पादुकांचा पहिला विसावा पाचाड मधील जिजाऊ मांसाहेबांच्या समाधी छत्री जवळ असेल. आऊसाहेबांचा आशीर्वाद व निरोप घेऊन सोहळा पहिल्या मुक्कामी पळसगाव खुर्द मधील मारुती मंदिरात येईल. त्यानंतर दुसऱया दिवशीचा मुक्काम श्रीरामपूरमध्ये करुन सोहळा तिसऱया दिवशीच्या मुक्कामास, दि. 30 जून 2021 रोजी ऐतिहासिक ताम्हिणी घाटातील जुन्या पाऊलवाटेने पुणे जिह्याच्या सीमेवर मुळशी तालुक्यातील आदरवाडी गावात येईल.
तेथून मजलदरमजल करत शिवाजी महाराज ज्येष्ठ शुद्ध दशमी, दि. 4 जुलैला तुकोबारायांच्या पालखी मार्गावर सामील होण्यासाठी पुण्यनगरीत दाखल होतील. भागवतधर्माचे संवाहक संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, माऊलींच्या वारीचे जनक जगद्गुरु तुकाराम महाराज व हिंदवी स्वराज्य संस्थापक छ. श्री शिवाजी महाराज यांच्या शक्तिधारा-भक्तिसागर भेटीचा उत्सव एकादशीच्या सूमुहूर्तावर हडपसरला 5 जुलैला पार पडून मग पालखी सोलापूर महामार्गाने चौफुला, दौंड, माळेगाव, बारामती, इंदापूर, अकलूज, तोंडले-बोंडले, भाळवणी मार्गे आषाढ शुद्ध दशमी, दि.19 जुलैला पांडुरंगाच्या दर्शन ओढीने पंढरपुरात मुक्कामी पोहचेल. आषाढी एकादशीला चंद्रभागास्नान व नगरप्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर आषाढी वारीतील शिवबा-विठोबा भेटीचा सोहळाङ श्रीविठ्ठल मंदिरात पार पडेल.
गुरुपौर्णिमेस नियोजित राष्ट्रसमर्पण अभिवादन असल्याने शिवरायांच्या पादुकांचा परतीचा प्रवास द्वादशीलाच वाहनाने होऊन केवळ तीनच मुक्कामात पालखी दि.23 जुलैला पुन्हा रायगडी दाखल होईल. जागतिक महामारी कोरोनाच्या दुसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्याच्या आयोजनात सहभागी होणाऱया विविध ग्रामप्रमुखांकडून मागील वर्षासारख्याच याही वर्षी सूचना मागविल्या गेल्या होत्या. त्या सर्व सूचना व भविष्यात लागू होऊ शकणारे शासनाचे संभाव्य प्रतिबंधात्मक निर्देश लक्षात घेता पालखी मार्गावरील 53 शाळांमध्ये होणारे भक्ति-शक्ति समन्वय जागरण रिंगण सोहळे यावर्षीही होणार नाहीत. त्याऐवजी गेल्या 5 वर्षातील विविध रिंगणांची संकलित चित्रे, ‘वर्तमानातील शिवभारत’ अंतर्गत विविध व्याख्यानांचा ध्वनीमुद्रिका संच आणि एक पालखी विशेषांक संबंधित शाळांना देण्यात येतील.
शिवरायांच्या पालखी समन्वयकांकडे कोरोना पार्श्वभूमीवर आयोजिलेला गतवर्षीचा रायगड ते पंढरपूर असा पायी चालण्याचा अनुभव गाठीशी आहेच. त्यामुळे वर्तमान परिस्थितीत समाजस्वास्थ्यास अत्यावश्यक ते शारीरिक आरोग्य अंतर कायम राखून, विसाव्याच्या गावाबाहेरच मुक्काम करुन, सुनिश्चित पालखी मार्गातील कोणत्याही गावात अजिबातच न मिसळता केवळ 5च शिवभक्त रायगड ते पंढरपूर असा पायी प्रवास याही वर्षी करतील. शिवरायांच्या पालखी सोहळ्याच्या नित्योपचाराच्या प्रथा व परंपरा कायम राखताना पालखी, दिखाव्याचा डामडोल, सोहळ्यातील व्यवस्थेची वाहने आदी सारे यंदाही टाळले जाणार आहे.
सकाळच्या प्रस्थानाची पूजा व शिववंदना, सायंकाळच्या विसाव्याची आरती व हरिपाठ सोडून बाकी सारे उपचार गेल्या वर्षाप्रमाणे यावर्षीही होणार नाहीत. रायगड ते पंढरपूर असा पूर्ण प्रवास शिवरायांच्या पादुकांना डोक्यावर घेऊनच यंदाही पालखी सोहळा संपन्न होणार आहे. पादुकांचे दर्शन त्या त्या गावातील शिवभक्तांना केले असून श्रींच्या पादुका दर्शनास कसलीही गर्दी न करण्याचे आवाहन सोहळा व्यवस्थापन समितीकडून केले गेले आहे.