प्रतिनिधी/ संकेश्वर
मणगुत्ती (ता. हुक्केरी) येथे शिवाजी ब्रिगेड व ग्रामस्थांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळय़ाची प्रतिष्ठापना नियोजित जागेत निर्माण करण्यात आलेल्या चबुतऱयावर करण्यात आली होती. पण केवळ 12 तासात बेनकनहोळी व बोळशनट्टी येथील ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे शुक्रवारी मध्यरात्री चोख पोलीस बंदोबस्तात व मोजक्या प्रमुख ग्रामस्थांच्या उपस्थितीत पुतळा उतरवण्यात आला. शनिवारी सकाळी हा प्रकार गावकऱयांच्या लक्षात येताच पुन्हा तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. वेळीच आमदार सतिश जारकीहोळी यांच्या मध्यस्थीनंतर तणावपूर्ण वातावरण कांहीसे निवळले आहे. परिणामी गावकऱयांनी पुन्हा त्याचठिकाणी पुतळय़ाची प्रतिष्ठापणा करावी, अशी मागणी केली आहे.
गावातील शिवप्रेमिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभा करण्याचा प्रयत्न चालवला होता. याकामी आर्थिक मदतीचा वाटा शिवाजी ब्रिगेडनी उचलून ग्रामपंचायतीने दिलेल्या नियोजित जागेत चबुतऱयाचे काम पूर्ण होताच कोरोनाच्या संकटात कोणतीही गर्दी न करता गुरुवारी 5 रोजी कार्यकर्त्यांनी चबुतऱयावर अश्वारुढ पुतळय़ाची प्रतिष्ठापना केली. यानंतर शुक्रवारी बेनकनहोळी व बोळशनट्टी ग्रामस्थांनी एकत्र येऊन पुतळय़ाची सदर जागा महालक्ष्मी यात्रेच्या काळात देवीला खेळवण्याची आहे. तेंव्हा हा पुतळा या जागेतून हटवावा, अशी मागणी तालुका प्रशासनासमोर केली. याचे गांभीर्य लक्षात घेऊन शुक्रवारी सकाळीच तहसीलदार, मंडळ पोलीस निरीक्षक, तालुका पंचायतीच्या कार्यनिर्वाहक अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट दिली. व गावकऱयांना पुतळा हटवण्यासाठी तगादा लावला. यावेळी पुतळा हटवत असतानाच गावातील महिलांनी चबुतऱयाभोवती गराडा घालून पुतळा हटवण्याला विरोध केला. यामुळे प्रशासनाने पुतळा न हटवता रितसर मंजुरी मिळेपर्यंत पुतळय़ावर प्लॉस्टिक घालून तो झाकून ठेवावा, असा तोडगा काढून पुतळा झाकण्यात आला. यावेळी महिला व ग्रामस्थांनीही हे मान्य केल्याने तणाव निवळला.
रात्रीत पुतळा चबुतऱयावरुन उतरविला
विरोधकांनी तालुका प्रशासनावर पुन्हा दबाव आणल्यानंतर काही मोजक्या प्रमुख ग्रामस्थांसमोर तालुका प्रशासनाने शुक्रवारी मध्यरात्री पोलीस फौजफाटय़ाच्या उपस्थितीत क्रेनच्या सहाय्याने पुतळा चबुतऱयावरुन उतरविण्यात आला. याची कोणालाही माहिती नव्हती. पहाटे चबुतऱयावरुन पुतळा उतरविण्यात आल्याचे लक्षात येताच संतप्त झालेले ग्रामस्थ व महिलांनी लक्ष्मी मंदिरात एकत्र येऊन आंदोलनाची दिशा ठरवू लागले. याचवेळी आमदार सतिश जारकीहोळी यांच्याकडे जाऊन परतलेल्या स्थानिक नेत्यांने पुतळा बसवू, असे आश्वासन आमदारांनी दिले असल्याचे सांगितले. तोपर्यंत शांतता राखा, असे आवाहन केल्यानंतर नागरिक शिवप्रेमी व महिलांनी माघार घेतली. मात्र पुतळा नियोजित जागेत बसविण्यात आला नाही तर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
ग्रामपंचायतीने पाच पुतळय़ाला दिला परवाना
मणगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा, महर्षि वाल्मिकी, यादव कृष्णगवळी, डॉ. बी. आर. आंबेडकर व बसवेश्वर महाराज असे पाच पुतळे बसवण्यासाठी 11-1-2019 रोजी झालेल्या ग्रामपंचायत बैठकीत ठरावाला मंजुरी देत परवाना दिला होता. याच्या आधारावरच शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळय़ाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.
रितसर परवाना मिळवा, आमचे सहकार्य असणार
शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळय़ाची करण्यात आलेली प्रतिष्ठापना बेकायदेशीर आहे. त्यामुळे हा पुतळा उतरवण्यात आला आहे. परवाना मिळवा मगच नियोजित जागेत पुतळा बसवण्यास गावकऱयांसोबत आम्हीही सहकार्य करु. महापुरुषांचा पुतळा बसवणे हे जोखमीचे काम आहे. तेंव्हा घाईगडबड न करता नियोजन करूनच पुतळय़ाची प्रतिष्ठापना करुया. सध्या हा पुतळा चावडीच्या सुरक्षित जागेत ठेवण्यात आला आहे, अशी माहिती मंडळ पोलीस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी यांनी दिली.
शिवपुतळय़ासाठी योग्य जागा
बेनकनहोळी व बोळशनट्टी ग्रामस्थांनी लक्ष्मीदेवी खेळवण्याच्या जागेचे कारण पुढे करून केलेला विरोध चुकीचा आहे. नियोजित जागेत कोणताच अडसर नाही. शिवाय एका बाजूला असल्यामुळे वाहतुकीसही याचा अडथळा होणार नाही. फक्त विरोध करायचा म्हणून विरोध जात केला आहे. पुतळा बसवण्याची नियोजित जागा योग्य आहे. शिवाय ज्या ठिकाणी हा पुतळा उभा होता. त्या गावातील शंभरटक्के ग्रामस्थांनी एकत्रितपणे प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला असताना दुसऱया गावातील नागरिकांनी यास विरोध करावा ही आश्चर्याची बाब आहे, असा संताप शिवप्रेमींनी व्यक्त केला.
रितसर आदेशानंतर पुतळा बसवावा
पुतळय़ांचे संरक्षण करणे, त्याचे व्यवस्थापन करणे व सुरक्षितता राखणे महत्त्वाचे आहे. वादग्रस्त परिस्थितीत कोणतीही अनाहूत घटना घडू नये, यासाठी प्रमुख ग्रामस्थांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन क्रेनच्या सहाय्याने पुतळा उतरवला आहे. अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी तालुका प्रशासन उपस्थित होते. काही दिवसात वरिष्ठ पातळीवरुन येणाऱया रितसर आदेशानंतरच पुतळा प्रतिष्ठापना करावी, अशी माहिती तहसीलदार अशोक गुराणी यांनी दिली.