ऑनलाईन टीम / पुणे :
हर हर महादेव… जय भवानी, जय शिवराय… छत्रपती शिवाजी महाराज की जयचा अखंड जयघोष… अशा वातावरणात शिवरायांच्या मूर्तीवर पारंपरिक पद्धतीने मंत्रोच्चारासह अभिषेक करुन श्री शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला. कोविडच्या पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेक सोहळयाचा सुवर्णक्षण यंदा किल्ले सिंहगडावर न साजरा करता सिंहगड रस्त्यावरील वीर बाजी पासलकर स्मारक येथे मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पडला.
विश्व हिंदू परिषद पुणे, श्री शिवज्याभिषेक अभिवादन सोहळा समिती (किल्ले सिंहगड) तर्फे तिथीनुसार (ज्येष्ठ शु. त्रयोदशी) हिंदू साम्राज्य दिनी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरनोबत पिलाजी गोळे यांचे वंशज मारुती गोळे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. सोहळ्याला विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय सत्संग प्रमुख दादा वेदक, संजय मुरदाळे, रा.स्व.संघाचे सिंहगड भागाचे संघचालक महेश लेले, कार्यवाह मंगेश पाटील, समितीचे अध्यक्ष किशोर चव्हाण, शरद जगताप, तुषार कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी शिवकथाकार समाजरत्न ह.भ.प.बाजीराव महाराज बांगर यांचे श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यावरील व्याख्यान झाले.
ह.भ.प.बाजीराव महाराज बांगर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांनी व त्यांचे सहकारी सरदार, मावळे यांनी मोठा पराक्रम गाजवून अनेक गड-किल्ले स्वराज्यात आणले. त्यांच्या पराक्रमाची आठवण ठेवत श्री शिवराज्याभिषेकासारखे कार्यक्रम तारखेने न साजरे करता, आपल्या संस्कृतीनुसार तिथीने साजरे करायला हवेत. तसेच तरुण पिढीला शिवरायांच्या पराक्रमाची आठवण करुन देत इतिहास देखील सांगायला हवा.
किशोर चव्हाण म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा केवळ रायगडावर न साजरा करता महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्वच गड-किल्ल्यांवर साजरा व्हायला हवा. त्याकरीता वि.हिं.परिषद व समितीतर्फे मागील चार वर्षांपासून किल्ले सिंहगड येथे हा सोहळा साजरा केला जातो. मात्र, दोन वर्षे कोविडच्या पार्श्वभूमीवर पुण्यातच हा सोहळा साधेपणाने व प्रातिनिधीक स्वरुपात होत आहे. पुढील वर्षी पुन्हा एकदा जोमाने शिवप्रेमी हा सोहळा सिंहगडावर साजरा करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.