सागर भेकणे यांचा आदर्श इतरांना प्रेरणादायी
वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येकाच्या घराघरात, मनामनात पोहोचले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मियांना सामावून घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपतींच्या विचारांनी राजकर्त्यांनी देशाचा कारभार चालविल्यास देश सुजलाम, सुफलाम होऊन जनता गुण्यागोविंदाने नांदेल, असे विचार म. ए. समिती युवा आघाडी अध्यक्ष शुभम शेळके यांनी व्यक्त केले.
म. ए. समितीचे निष्ठावंत युवा कार्यकर्ते शिवभक्त सागर सोमनाथ भेकणे यांनी आपल्या घराच्या प्रांगणात शनिवारी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची प्रतिष्ठापना केली. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी ट्रक बॉडीबिल्डर व शिवभक्त सोमनाथ भेकणे होते. व्यासपीठावर ग्रा. पं. अध्यक्षा संध्या चौगुले, उपाध्यक्ष अनिल पावशे, बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड. सुधीर चव्हाण, ग्रा. पं. सदस्य दत्ता पाटील, यल्लोजी पाटील, दादासाहेब भदरगडे, तानाजी पाटील, नवनाथ पुजारी, जयराम पाटील, किरण तरळे, मयूर बसरीकट्टी, ग्रा. प. माजी अध्यक्ष गजानन पाटील, निरंजन जाधव, शंकर पाटील, रवि चव्हाण, शंकर कोनेरी उपस्थित होते.
प्रारंभी प्रास्ताविकमध्ये प्रशांत पवार यांनी सोमनाथ भेकणे, सागर भेकणे कुटुंबीयांची शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवाजी महाराजांचा आदर्श कायम डोळय़ासमोर राहावा हा उद्देश ठेऊन आपल्या घराच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची प्रतिष्ठापना करून इतरांनीसुद्धा त्यांचा आदर्श घेण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याचे स्वागत करत उपस्थितांचेही स्वागत केले.
यावेळी ग्रा. पं. अध्यक्षा संध्या चौगुले, उपाध्यक्ष अनिल पावशे, सोमनाथ भेकणे, लक्ष्मी भेकणे, ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील आदींच्या हस्ते मूर्तीला दुग्धाभिषेक घालण्यात आला.
म. ए. समिती युवा आघाडी अध्यक्ष शुभम शेळके व ऍड. सुधीर चव्हाण यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळय़ाचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी दत्ता खनगावकर यांनी श्रीफळ वाढविले. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, अशा घोषणांनी यावेळी परिसर शिवमय करण्यात आला.
ऍड. सुधीर चव्हाण म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते. परस्त्रीला आई-बहिणीचा मान होता. छत्रपतींच्या विचाराने देशाचा कारभार चालल्यास देशाचे नंदनवन होईल, असे ते म्हणाले.
यावेळी यल्लोजी पाटील, गजानन पाटील यांनीही छत्रपतींच्या आठवणींना आपल्या मनोगतातून उजाळा दिला.
तत्पुर्वी शिवभक्त अवलिया सागर भेकणे यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन भेकणे कुटुंबीयांच्यावतीने स्वागत केले. कार्यक्रमाला शिवभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशांत पवार यांनी सूत्रसंचालन केले. सदानंद चव्हाण यांनी आभार मानले.