ठेकेदाराच्या कर्मचाऱयांकडे सापडली कुपन
प्रतिनिधी/ रत्नागिरी
गोरगरिबांसाठी राज्य सरकारने शिवभोजन थाळी अगदी थाटामाटात सुरू केली. मात्र योजना सुरू झाल्याच्या दुसऱया दिवशी रत्नागिरी शासकीय रूग्णालयात बोगस लाभार्थी आढून आले. ठेकेदार कंपनीच्याच दोन कर्मचाऱयांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे फोटो व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. बोगस लाभार्थ्यांची माहिती पडताळणीसाठी शिवभोजन ऍपचा ‘बॅकअप’ तपासणीचा प्रयत्न केला असता तांत्रिक अडचणीमुळे तो मिळू शकला नाही. विशेष म्हणचे ‘प्रगतशील’ महाराष्ट्रातील या योजनेचा ‘रिमोट’ हैद्राबादमध्ये आहे. दोन तीन दिवसात ऍपमधील तांत्रिक समस्या दूर होतील असे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.
उद्धव ठाकरे सरकारने गोर गरिबांना 10 रूपयांत जेवण देण्याच्या घोषणेची पुर्तता करताना प्रजासत्ताक दिनी शिवभोजन योजना कार्यान्वित केली. त्यानुसार रत्नागिरी शहरात रेल्वेस्टेशन, एस.टी.स्टँड आणि सिव्हील हॉस्पीटल या तीन ठिकाणी ही योजना सुरू झाली. यामधील सिव्हील हॉस्पीटलमध्ये डिएम एंटरप्रायझेसकडे शिवभोजन थाळीचे काम आहे. या ठेकेदार कंपनीचे कर्मचारीच कुपन घेवून याठिकाणी जेवत असल्याची बाब नागरिकांनी लक्षात आणून दिली. जे कर्मचारी शिवभोजन थाळी वितरीत करत होते तेच नंतर त्याला लाभ घेतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत.
12 ते 2 यावेळेत 100 थाळीची मर्यादा ठेवण्यात आली आहे. याठिकाणी सोमवारी 79 जणांनी या स्वस्त जेवणाचा लाभ घेतला. ठेकेदाराचे कर्मचारीच या ठिकाणी जेवणाचा लाभ घेताना आढळल्यामुळे अन्य बोगस लाभार्थ्यांचाही भरणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावेळी संबधीत दोन कर्मचाऱयांशी पत्रकारांनी संपर्क साधला असता लाभार्थ्यांची संख्या कमी होती म्हणून मेसमधील दादांनी आम्हाला कुपन दिले अशी माहिती त्यांनी दिली.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी येणाऱया व्यक्तीचा प्रथम फोटो काढला जातो. तो फोटो संबधीत ऍपवर अपलोड करून मगच कुपन दिले जाते. इथपर्यंतची प्रक्रिया सुरळीत होते मात्र प्रक्रिया केल्यानंतरचा तडताळणी करायची झाल्यास शिवभोजन ऍपवर तांत्रिक समस्या दाखवली जाते. त्यामुळे ऍपचा हेतू सध्या तरी पुर्ण होताना दिसत नाही. ही समस्या दूर होण्यासाठी आणखी काही दिवस लागतील असे प्रशासनाचे म्हणणे आहे. ऍपची परीपुर्ण चाचणी घेण्याआधीच गडबडीने योजना सुरू केली आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.
येथील रेल्वेस्टेशन व एस.टी स्टँड मंगला केटर्स येथे शिवभोजनाचा 100 लोकांनी लाभ घेतला तसेच 30 ते 40 लाभार्थी जेवण मिळाले नाही म्हणून परत गेल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली.
शिवभोजनाचा लाभ घेणारे सर्वजण गरजूच होते. याच लाभार्थ्यांची संख्या गृहीत धरली जाईल. आमच्या दोन महिला कर्मचाऱयांनी जेवण केल्याचे ग्राहय़ धरले जाणार नाही. त्यांचे कुपन रद्द करण्यात आले आहे.