प्रतिनिधी / कोल्हापूर
छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रति वर्षी 6 जुन रोजी साजरा होणारा शिवराज्याभिषेकदिन यापूढे शिवस्वराज्यदिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. राज्यकारभार कसा असावा याच आदर्श म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देटालाही हात न लावण्याचा त्यांची आज्ञा आजही आदर्शाचा उत्तम नमुणा आहे. त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी शासनोने निर्णय घेतला आहे. अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. शासकीय विश्रामगृहात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर उपस्थित होते.
शिवराज्याभिषेकचा हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा आहे. अशा भूमी पुत्राच्या स्वातंत्र्यदिनाचे महत्व आणखी दृढ होण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद कार्यालयामध्ये सकाळी 11 वाजता सर्व पदाधिकारी. अधिकारी, कर्मचाऱयांनी कार्यालाबाहेर गुढी उभारून अभिवादन करावे, महाराष्ट्रगीत आणि राष्ट्रगीताचे गायन करून कार्यक्रम संपन्न करावा असे आदेश देण्यात आले आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. ग्रामविकास विभागाबरोबर, महापालिका, नगरपालिका, नगर पंचायती, सहकारी संस्थांमध्येही हा कार्यक्रम घेण्याचा निर्णय होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज भारतीयांचे प्रेरणास्थान आहे. अशा महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील 6 जून 1674 शिवराज्याभिषेकदिन महत्वाचा दिवस आहे. महाराजांनी स्वत:चा राज्याभिषेक करून घेतला. याच दिवशी स्वराज्याचे सार्वभौमत्व दुर्ग रायगडाच्या सदरेवरुन घोषीत झाले. श्री शिवशकाची निर्मीती करून राजे शककर्ते झाले. शिवकालगणणेलाही यादिवशी प्रारंभ झाला. तो दिवस शिवस्वराज्य दिवस म्हणून साजरा करण्याची मागणी विविध स्तरातून करण्यात येत आहे. त्यासाठीच महाविकास आघाडीने शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.