मंडोळी येथील व्याख्यानमालेत निलेश जगताप (पुणे) यांचे आवाहन : ग्रा. पं. सदस्य, अंगणवाडी, आशा कार्यकर्त्यांचा सत्कार
खानापूर / बातमीदार
लहानपणी स्वतःच्या आई-वडिलांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार व त्यांनी सांगितलेल्या तत्त्वानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवनात आचरण केले. स्वतःचे साम्राज्य निर्माण करण्यासाठी अहोरात्र परिश्रम केले. स्वतः राजा झाल्यानंतर प्रजेलाही सुखी-समाधानी ठेवून छत्रपती होण्याचा मान मिळवला. जसे शिवाजी महाराजांनी अल्पावधीत जे कार्य केले आहे तसेच कार्य आजच्या तरुणांनीही करावे व शिवाजी महाराजांचा आदर्श घेत प्रत्येकाने जीवनात वाटचाल करावी, असे आवाहन शिवव्याख्याते निलेश जगताप (पुणे) यांनी केले.
मंडोळी ता. बेळगाव येथील श्री गणेश मंदिर जीर्णोद्धार कमिटी व ग्रामस्थांच्यावतीने गणेश जयंती निमित्त शिवचरित्रावर सामाजिक प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्य व कोरोनाच्या काळात उत्तम सेवा बजावलेल्या अंगणवाडी व आशा कर्मचारी तसेच ग्राम पंचायत कर्मचाऱयांचा सत्कार गणेश मंडळाच्यावतीने करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंदिर कमिटीचे कृष्णा यल्लाप्पा पाटील होते.
यावेळी व्यासपीठावर ग्राम पंचायत अध्यक्षा लक्ष्मी कणबरकर, उपाध्यक्षा सुवर्णा होसकोटी, माजी उपाध्यक्षा वनिता शहापूरकर, उद्योजक वाय. बी. नावगेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवव्याख्याते निलेश जगताप यावेळी म्हणाले, शिवाजी महाराजांच्या काळात हुंडय़ाला विरोध होता. त्यामुळे शिवाजी महाराजांनी आपल्या मुलींच्या लग्नात हुंडा दिला नाही व मुलांची लग्ने करतानाही हुंडा घेतला नाही. शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यातील सैनिकांना व्यसनापासून दूर ठेवले होते. आपले हिंदवी स्वराज्य निर्माण करणे हेच त्यांचे ध्येय होते. शिवाजी महाराजांच्या काळात शेतकरी होते. पण एकाही शेतकऱयाने आत्महत्या केल्याचा उल्लेख इतिहासात आढळत नाही. त्यामुळे त्याकाळी शेतकरी किती सुरक्षित होते, याची जाणीव यावरून होते. आजच्या काळात जरी त्या वेळीच्या सारखे युद्धकौशल्य जरी आपल्या मुलांना शिकवले नसले तरी आजच्या स्पर्धात्मक युगात आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन मोठमोठय़ा अधिकार पदापर्यंत त्यांनी मजल मारली पाहिजे. मोठय़ा व्यवसायात त्यांनी सहभागी झाले पाहिजे. मराठय़ांच्या मुलांनी चांगली स्वप्ने बघितली पाहिजेत. यासाठी आई-वडिलांनी आपल्या मुलांना चांगले प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे मतही त्यांनी मांडले. या व्याख्यानाला मंडोळी व परिसरातील अनेक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.