प्रा. अनिल चौधरी यांचे प्रतिपादन : लोकमान्य सामाजिक सांस्कृतिक केंद्रातर्फे ‘मराठा शौर्य दिन’ साजरा
प्रतिनिधी / बेळगाव
मोगलांचा अभ्यास हा रक्तरंजित करणारा असून देशावर सातत्याने आघात करणारा होता. दिल्ली व आग्य्रात बसलेल्या मोगलांमध्ये पंथभेद होता. शहाजादे, इराणी, पठाण, सरदार, तसेच जयवंतसिंह राठोडमध्ये राजपूत राजे या सर्वांनी छत्रपती शिवरायांपुढे हात टेकले. वैयक्तिक शौर्य, संघटक व नायक म्हणून शिवराय अग्रगण्य होते. असे शिवराय समजून घेण्यासाठी पहिल्यांदा औरंगजेब समजून घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रा. अनिल चौधरी यांनी केले. शिवराय खरे लोकशाहीवादी राजे होते, असेही ते म्हणाले.
लोकमान्य सामाजिक सांस्कृतिक केंद्राच्यावतीने गुरुवारी कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिरात नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदान दिनानिमित्त ‘मराठा शौर्य दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी ते ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब’ या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य परिवाराचे संस्थापक व तरुण भारतचे समूहप्रमुख आणि सल्लागार संपादक किरण ठाकुर होते. व्यासपीठावर लोकमान्यचे संचालक अजित गरगट्टी, सेवंतीभाई शहा, पंढरी परब, गजानन धामणेकर, विठ्ठल प्रभू, सुबोध गावडे, सीईओ अभिजित दीक्षित उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
प्रा. अनिल चौधरी पुढे म्हणाले, औरंगजेबची अर्धी हयात महाराष्ट्रात गेली असून शेवटचा श्वासदेखील महाराष्ट्रात घेतला. लहानपणीच वेगवेगळे शिक्षण त्याने नसानसात बिंबवून घेतले होते. शहाजहानचा तिसरा मुलगा म्हणून ओळखला जाणारा औरंगजेब शूर देखील होता. औरंगजेबने लहानपणीच हत्तीवर चालून जाऊन हल्ला केला होता. त्याचवेळी औरंगजेब हा प्रत्येक संकटावर तुटून पडणारा आहे, हे समजले होते. असा तोडीस तोड देणारा पराक्रमी शिवरायांसमोर उभा ठाकला होता.
शिवाजी महाराजांनी आखलेल्या योजना उत्तम होत्या. त्याचबरोबर लाल महालात केलेला हल्लादेखील श्रेष्ठच आहे. अफजलखानाशी केलेले युद्ध, शाहिस्तेखानावर छापा, सुरतेची लूट, एवढेच नाही तर औरंगजेबच्या दरबारात त्यांनी केलेला बिनधास्त प्रवेश शौर्याची प्रचिती देतो. शिवरायांनी समानतेचे तत्त्व जोपासले. सैन्यामध्ये सर्व जाती-धर्मांच्या लोकांना समाविष्ट करून घेतले. शेतकरी, सामान्य माणूस, कारकून या सर्वांना स्वराज्यात महत्त्वाचे स्थान होते. असे शिवराय दरबारातून निसटून गेले ही सल देखील औरंगजेबला लागून होती. आपल्याच घरातील 36 जणांना मारणारा औरंगजेब हा निष्ठूर देखील होता. औरंगजेबच्या कडेकोट बंदोबस्तातून महाराजांनी सहीसलामत सुटका करून घेतली व रायगडावर सुखरुप पोहोचले. जिजाऊंनी केलेल्या संस्कारामुळे व पराक्रमामुळे शिवराय हे अद्वितीय आहेत. महाराष्ट्राच्या मातीला मिळालेला लढवय्या वारसा हा जुन्या काळापासूनचा आहे. अशी ही भूमी जागृत असून ती टिकविण्याचे काम आपल्या प्रत्येकाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
बेळगावबरोबरच महाराष्ट्रात जन्माला येणारा भाग्यवान
यावेळी लोकमान्य सोसायटीचे संस्थापक किरण ठाकुर म्हणाले, राष्ट्राभिमान जागृत होण्यासाठी शिवरायांची व्याख्याने, जाणता राजाचे प्रयोग लोकमान्यमार्फत आयोजित केले जातात. लहानपणीच राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, राष्ट्राभिमान निर्माण होण्यासाठी शिवजयंतीसारखे उत्सव साजरे केले जातात. शिवरायांचे वर्णन अनेकांनी केले असून रामदासांनी केलेल्या वर्णनाला तोड नाही. शिवरायांचा बेळगावला पदस्पर्श झाला असून बेळगावबरोबरच महाराष्ट्रात जन्माला येणारा भाग्यवान आहे. शिवरायांसारखा पराक्रमी राजा जगात कोठेही झाला नाही. शिवरायांचा एक जरी गुण आपल्यात आणल्यास आपले जीवन सार्थकी लागेल. लोकमान्यतर्फे सैन्य भरती सेंटर चालविले जात असून ते मराठा लाईट इन्फंट्रीशी निगडीत आहे. याठिकाणी सर्व ती पूर्वतयारी करून घेतली जाते. या सेंटरमध्ये ट्रेनिंग घेऊन अनेक तरुण देशसेवा करत असल्याचेही ठाकुर यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे संचालक पंढरी परब स्वागत व प्रास्ताविक करताना म्हणाले, बेळगाव शहराला ऐतिहासिक पारंपरिक वारसा आहे. मराठा लाईट इन्फंट्री त्याचेच एक उदाहरण आहे. शिवजयंती व तरुण भारतला 100 वर्षांची परंपरा आहे. ती जपण्याचे काम होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नवी पिढीला समजावा यासाठी संस्कृतीचा वसा जपला पाहिजे. शिवरायांवर व्याख्याने आयोजित करून युवापिढीला प्रेरणा देण्याचे कार्य सुरू आहे. शिवाय शिवजयंती व गणेशोत्सव मंडळांना पारितोषिके देऊन प्रोत्साहन देण्याचे कामदेखील केले जात असल्याचे सांगितले.
मराठा शौर्य दिनाचे औचित्य साधून लष्करातून निवृत्त झालेल्या जवानांचा किरण ठाकुर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
याप्रसंगी रसिक, शिवभक्त उपस्थित होते. समन्वयक विनायक जाधव यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.