बाबासाहेब पुरंदरे यांनी पुण्यात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
प्रतिनिधी / पुणे
गेल्या काही दिवसांपासून बाबासाहेब आजारी होते. त्यातच 28 ऑक्टोबर रोजी ते घरात पाय घसरुन पडल्याने त्यांच्या डोक्मयाला इजा झाली. त्यामुळे त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांना मोनियाचे निदान झाले. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. रविवारी सायंकाळपासून त्यांच्या निधनाबाबत उलट-सुलट चर्चा सुरू होत्या. याचदरम्यान ‘तरुण भारत’चे समूह प्रमुख किरण ठाकुर यांनी इस्पितळात धाव घेत कुटुंबीय आणि निकटवर्तीयांची भेट घेतली. त्यानंतर रात्री उशिराने निधनाच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. सोमवारी सकाळी बाबासाहेबांचे पार्थिव त्यांचे पुत्र ताब्यात घेणार आहेत. त्यानंतर पुरंदरे वाडय़ावर पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल, असे सांगण्यात आले.
बाबासाहेबांनी नुकतेच शंभरीत पदार्पण केले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार होणार असून ते जगप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असल्यामुळे त्यांच्या अंत्यदर्शन आणि अंत्यसंस्काराला जनसागर लोटण्याची शक्यता आहे.
बळवंत मोरेश्वर पुरंदरे अर्थात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म पुण्याजवळील सासवड येथे 29 जुलै 1922 रोजी झाला. तरुणपणीच इतिहासाची व प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची आवड त्यांना लागली. या वयातच ते पुण्यात आले व भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेत काम करू लागले. या ठिकाणीच इतिहास संशोधक ग. ह. खरे हे बाबासाहेबांना गुरुस्थानी लाभले व इतिहास संशोधक म्हणून त्यांची वाटचाल सुरू झाली. पुणे विद्यापीठाच्या ‘मराठा इतिहासाची शकावली- सन 1740 ते 1761’ या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही ते जवळून संपर्कात होते. त्या काळातच त्यांनी प्रल्हाद केशव अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन करण्यास सुरुवात केली. तसेच मेहुणे श्री. ग. माजगावकर यांच्याबरोबर ‘माणूस’मध्येही त्यांनी काम केले. प्रसिद्ध साहित्यिक, इतिहास संशोधक गो. नी. दांडेकर यांचा सहवासही त्यांना लाभला. या दोन संशोधकांनी अनेक गड, रानवाटा एकत्र पालथ्या घातल्या.
जिज्ञासू, चिकीत्सक तसेच संशोधक वृत्तीमुळे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील संशोधनासाठी जंग जंग पछाडले. देशासह अख्खा महाराष्ट्र त्यांनी पालथा घातला. बाबासाहेबांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांसह मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला. या संशोधनावर त्यांनी पुस्तकेही लिहिली. तसेच महाराजांवर शेकडो व्याख्यानेही त्यांनी दिली. ते नेहमी गडांवर एकत्र भटकंती करीत.
शिवचरित्र घरोघरी पोहोचविले
पुरंदऱयांची दौलत, पुरंदऱयांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड व राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे प्रकाशित झालेले साहित्य. शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. या ग्रंथाच्या आजवर लाखो प्रति विकल्या गेल्या आहेत.
दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात सहभाग
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पोर्तुगीजांच्या ताब्यातील भारताचा उर्वरित भाग परत मिळविण्यासाठी लढल्या गेलेल्या दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात बाबासाहेब पुरंदरे हे सुधीर फडके यांच्याबरोबर हिरिरीने सहभागी होते. आपल्या कारकिर्दीत बाबसाहेबांनी अनेक गडकिल्ले पालथे घातले, इतिहासातील मंडळींच्या वंशजांना ते भेटले, बरीच माहिती गोळा केली आणि याचसोबत बाबांनी अनेक दुर्मिळ अशा ऐतिहासिक वस्तू जमविल्या आणि आपले घर अशा वस्तूंनी भरून टाकले.
‘जाणता राजा’ महानाटय़ाची निर्मिती
‘फुलवंती’ व ‘जाणता राजा’ ही नाटकेही बाबासाहेबांनी लिहिली, दिग्दर्शित केली. ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे देशविदेशात शेकडो प्रयोग झाले आहेत. याचा पहिला प्रयोग 14 एप्रिल 1984 रोजी झाला. या प्रयोगांच्या उत्पन्नातून बाबासाहेबांनी अनेक संस्थाना लाखो रुपयांची मदत केली आहे. हे नाटक हिंदी-इंग्रजीसह 5 अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे. ‘जाणता राजा’ मध्ये 150 कलावंत काम करीत असून, हे महानाटय़ डोळय़ांचे पारणे फेडणारे आहे.
महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषणने सन्मान
बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करत त्यांना अनेक पुरस्कार प्रदान केले गेले. यामध्ये इतिहास संशोधनातील योगदानाबद्दल डी.लिट. (2013) ही पदवी, प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार, 2015 साली महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि 2019 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार समाविष्ट आहेत. 2015 साली महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने शिवशाहिरांना गौरविण्यात आले. तर 2019 साली पदमविभूषण पुरस्काराने बाबासाहेबांचा गौरव करण्यात आला होता.
‘लोकमान्य मातृभूमी पुरस्कारा’चे मानकरी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राच्या माध्यमातून राष्ट्रबांधणीचे काम करणाऱया शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांचा ‘लोकमान्य को. ऑप. सोसायटी’च्या वतीने 2010 मध्ये ‘लोकमान्य मातृभूमी राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला होता. रोख पाच लाख 51 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. 17 ऑगस्ट 2010 रोजी पुणे येथे समारंभपूर्वक बाबासाहेबांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.