ऑनलाईन टीम / नागपूर :
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार द्या अशी मागणी हिंदुत्ववादी नेते प्रवीण तोगाडिया यांनी आज नागपुरमध्ये केली. राम मंदिर आंदोलनात बाळासाहेब ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी तोगडियांनी केली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत राम मंदिर उभारण्यासाठी सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशानुसार ट्रस्ट स्थापन करण्याची घोषणा केली. त्या पार्श्वभूमीवर प्रवीण तोगडियांनी ही मागणी केली.
ते म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे प्रखर हिंदुत्वादी नेते होते. अयोध्येतील राम मंदिर आंदोलनात त्यांनी उघड भूमिका घेतली होती. तसेच राम मंदिर आंदोलनाचा पाया रचणाऱया आणि त्याचे नेतृत्व करणाऱया बाळासाहेब ठाकरे यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस आणि महंत अवैधनाथ यानाही भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.