कोल्हापूर/प्रतिनिधी
राज्याच्या तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत. मी दिल्याशिवाय घंटा मिळणार नाही. असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. त्यावर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार बोलले ते योग्यच आहे. राज्य सरकार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवते. शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांनी फक्त गाड्या चालवण्याचे काम करायचे. अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. कोल्हापुरातील रंकाळा तलाव येथे आयोजित चाय पे चर्चा वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिला नाही. राज्यकर्ते पोलीस प्रशासनाचा स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करून घेणे सुरु आहे.
ही दडपशाही सुरू आहे. त्यामुळे जळगावची घटना काही नवीन नाही. अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकाला जबर मारहाण केली आहे. जळगाव मधील घटनेबाबत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
वीज कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कामगार संघटनेने संप पुकारलेला आहे. मात्र अत्यावश्यक बाब दाखवत राज्य सरकारने मेस्मा कायदा लागू केला आहे. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर प्रहार केला आहे. कर्मचाऱ्यांनी संप करू नये म्हणून एसटी,वीज कर्मचाऱ्यांचे बाबतीमध्ये दडपशाही सुरू आहे. हि बाब अत्यंत चुकीची आहे. लोकशाही मध्ये मागण्या मान्य करून घेण्याचा अधिकार सर्वाना आहे. अशी बंधने घालण्याची वेळ का येते ? याचा विचार सरकारने करावा. असे पाटील म्हणाले.