सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी ः दोन्ही गटांकडून याचिका
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी बंड करून महाराष्ट्रात सत्तास्थापन केली खरी, परंतु ठाकरे आणि शिंदे यांच्यापैकी खरा शिवसेनेचा वाघ कोण याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांच्या गटाने बंड केल्यावर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यातील ही लढाई सर्वोच्च न्यायालयासमोर पोहोचली आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाने न्यायालयात एकूण 5 याचिका दाखल केल्या आहेत. मात्र दाखल सर्व याचिकांवर न्यायालय हे प्रकरण घटनापीठाकडे सोपविणार का याचिकांवर आजच संपूर्ण निर्णय देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शिवसेनेने याप्रकरणी तातडीने सुनावणी घेण्यात यावी अशी विनंती केली होती. मात्र त्यावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी ही नियोजित वेळापत्रकानुसार होईल असे स्पष्ट केले होते. तसेच हे प्रकरण आणखी मोठय़ा खंडपीठाकडे सोपवावे की नाही हे ठरवायचे आहे, असे न्यायालयाने म्हटले होते. यामुळे आज होणाऱया सुनावणीत काय घडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने दावा केला आहे. यामुळे ती सुनावणी निवडणूक आयोगासमोर सुरू आहे. मात्र न्यायालयीन सुनावणी होईपर्यंत शिवसेनेच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय देऊ नये अशी सूचना न्यायालयाने केल्याने आज होणाऱया सुनावणीत बऱयाच गोष्टी स्पष्ट होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शिवसेनेने शिंदे गटातील 40 पैकी 16 आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे व्हीप उल्लंघन केल्याप्रकरणी शिवसेनेच्या 14 आमदारांवर कारवाई करण्याची मागणी शिंदे गटाने केली आहे. त्यामुळे नेमके कोण अपात्र होणार यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाने आपणच खरी शिवसेना असून धनुष्यबाण या चिन्हावर आमचाच हक्क असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. मागील सुनावणीत निवडणूक आयोगाने या सगळय़ा प्रकरणातील स्वतःची भूमिका सर्वोच्च न्यायालयासमोर मांडली होती.
सरन्यायाधीश होणार निवृत्त
विद्यमान सरन्यायाधीश एन.व्ही. रमना हे 26 ऑगस्टला निवृत्त होणार आहेत. महाराष्ट्रातील राजकीय पेचाबद्दलची सुनावणी त्यांच्याच खंडपीठासमोर आहे. तर 27 तारखेपासून उमेश लळीत हे सरन्यायाधीश म्हणून काम पाहतील.
निवडणूक आयोगातही सुनावणी
शिवसेना पक्ष 23 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगासमोर कागदपत्रे सादर करणार आहे. आयोगाने शिवसेनेवरील दावा मजबूत करण्यासाठी संबंधित पुरावे सादर करण्याचा निर्देश दिला होता. शिंदे गट खासदार अन् आमदारांच्या बहुमताच्या आधारावर शिवसेना पक्षावर दावा करत आहे. तर ठाकरे गटाने खासदार अन् आमदारच पक्ष नसतात, तर हजारो, लाखो कार्यकर्त्यांनी पक्ष निर्माण होत असल्याचा युक्तिवाद केला आहे. शिवसेनेच्या वतीने सुभाष देसाई, अनिल देसाई आणि अनिल परब हे वकिलांसोबत आयोगासमोर हजर राहणार आहेत.