मुंबई \ ऑनलाईन टीम
अयोध्येतील राम मंदिर निर्माणात कथित जमीन घोटाळाप्रकरणी शिवसेनेकडून सातत्याने निशाणा साधला जात आहे. राम मंदिर निर्माणात काही घोटाळा झाला असेल, तर त्यात स्वतः पंतप्रधान मोदींनी लक्ष घालायला हवे, असे शिवसेनेने म्हटले आहे. तर, शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच सरसंघचालक मोहन भागवत यांनी खुलासा करावा अशी मागणी केली आहे. यावर आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे.
भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, राम मंदिराच्या धर्मकार्यात अडथळा आणणारी शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर नाचते आहे, हे जगाला ठाऊक आहे. काँग्रेस, शिवसेना आदी विरोधकांनी केलेले आरोप बोगस होते हे उघड झाले आहे. सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी आहे लक्षात ठेवा. जय श्रीराम…” असं भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
यापूर्वीही अतुळ भातखळकर यांनी या मुद्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेवर जोरदार टीका केलेली आहे. लोकांनी श्रद्धा आणि विश्वासाने राम मंदिरासाठी देणग्या दिल्या आहेत, त्याचा व्यवस्थित हिशोबही ठेवला जातो. शिवसेनेला विश्वास नसेल तर त्यांनी दिलेले एक कोटी परत मागावे. त्यातून एखादी टिपूची मजार बांधावी. शिवसेनेच्या जीवावर मंदिर निर्माण सुरू नाही, असं देखील याआधी अतुल भातखळकर यांनी म्हटलं होतं.