ऑनलाईन टीम / मुंबई :
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरुन खासदार संजय राऊत आज गाझीपुरमध्ये आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जात आहेत. स्वतः संजय राऊत यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत उसळलेल्या रोषानंतर राजधानीतील शेतकरी आंदोलन निर्णायक टप्प्यावर आले आहे. त्यानंतर राऊतांनी दुपारी एक वाजता शेतकऱ्यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, महाविकास आघाडीने शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या संकट काळात त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. शेतकऱ्यांची तडफड आणि अश्रू अस्वस्थ करणारे आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरुन आज गाझीपूर सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांना भेटत आहे.
दरम्यान, केंद्र सरकाच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात मागील जवळपास दोन महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱी संघटनांकडून आज एक आणखी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, 6 फेब्रुवारी रोजी शेतकरी संघटनांकडून देशव्यापी चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी याची घोषणा केली आहे. याच दिवशी दुपारी 12 ते 3 या वेळेत सर्व रस्ते देखील अडवले जाणार आहेत. दरम्यान, या घोषणेनंतर आता गाझीपुर बॉर्डरवरील सुरक्षा व्यवस्थेत अधिक वाढ करण्यात आलेली आहे.