मरिआई चौक ओलांडून दाखवण्याचे आव्हान, सांगोल्यात येऊन प्रत्युत्तर देणार
प्रतिनिधी/सोलापूर
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात आल्यानंतर आता शिवसेना आणि भाजपमधील वाद पुन्हा पेटला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना फोन करून दम भरला. मुख्यमंत्री ठाकरे यांचा पुतळा जाळण्याच्या कृतीला सांगोल्यात येऊन विचारणार असून यापुढे सोलापुरात आल्यानंतर मंगळवेढा रोडवरील मरिआई चौक ओलांडून दाखवण्याची धमकी देखील बरडे यांनी जिल्हाध्यक्ष देशमुख यांना फोनवरून दिली.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनाच्या वेळी भाजपने शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला होता.
भाजपच्या या कृतीने संतप्त झालेले शिवसेना जिल्हाप्रमुख बरडे यांनी याचा जाब भाजपा जिल्हाध्यक्ष देशमुख यांना विचारला. तुम्ही सोलापुरात येऊन माझे दैवत उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केलात, हे चुकीचे आहे. तुम्हाला मागेही सांगितले आहे की, तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात, जिल्हा पातळीवरील नेत्यांना काहीही बोला. आम्ही भाजपा नेते पंतप्रधान मोदी, फडणवीस यांच्याबद्दल काही बोलत नाही, तुम्ही थेट आमचे दैवत उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला आहात, याला प्रत्युत्तर मी सांगोला येथे तुमच्या गावी येऊन देणार असल्याचाही इशारा श्री. बरडे यांनी देशमुख यांना दिला.
भाजपाचे नेते सांगत आहेत की, पुतळा जाळण्यासाठी तुम्ही पुतळा आणला आहे. तुम्ही जिह्याचे नेते आहात, जिह्यातील प्रश्न मांडा, तुमची पातळी ओळखून बोलत चला, असेही बरडे यांनी देशमुख यांना सुनावले.
दरम्यान बरडे हे बोलत असताना श्री. देशमुख यांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी ऐकून घेतले नाही, तसेच त्यांना बोलू देखील दिले नाही. देशमुख यांनी श्विसेनेने भाजप मंत्री राणे यांचे पोस्टर लावून आंदोलन केल्याचे सांगितले. यावर बरडे यांनी मंत्री राणे हे काही भाजपचे नेते नाहीत, राणे यांनी बऱयाच वेळा पक्ष बदल केला आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदापेक्षा आमचे दैवत आहेत. ठाकरे परिवाराविरुद्ध कोणीही काहीही वर्तणूक केल्यास खपवून घेणार नसून याला प्रत्युत्तर देणार असल्याचा इशाराही बरडे यांनी दिला.
तुम्ही ओबीसी प्रश्नावर भांडत आहेत, मराठा समाजाची वर्गणी दिली नसल्याचे बरडे यांनी सांगितले. या वाक्याला देशमुख यांनी तीव्र आक्षेप घेत वर्गणी †िदल्याचे ठणकावून सांगितले. वर्गणी दिली नसल्याचे सिद्ध झाल्यास राजकारण सोडून देण्याची देखील भाषा वापरली. देशमुख यांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र बरडे यांनी त्यांचे ऐकून घेतले नाही, शिवाय बोलण्याची संधी देखील †िदली नाही.
मुख्यमंत्री ठाकरे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरून बरडे आणि देशमुख यांच्यामध्ये रंगलेले फोनवरील वाप्युद्ध सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले हेते.
शिवसेना- भाजपमध्ये वादाची धग वाढली
केंद्रीय मंत्री राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल एकेरी शब्द वापरल्यानंतर मंत्री राणे यांच्याविरुद्ध सोलापुरात शिवसेनेने मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या वेळी शिवसेना- भाजपा आमनेसामने आली होती. यानंतर बुधवारी मुख्यमंत्री ठाकरे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात आल्यानंतर दोन्ही पक्षांतील वाद पुन्हा वाढला आहे. रस्त्यावर पक्षीय पातळीवर होणारे वाद, आंदोलन आता वैयक्तिक पातळीवर जाऊन दमबाजीपर्यंत जात आहे. शिवसेना, भाजप वादाची धग वाढू लागली आहे.
देशमुख हे स्वतःला प्रतिमोदी समजत आहेत
बोगस गोळीबार केलेला, दोन वेळा डिपॉझिट जप्त झालेला, दहा मते स्वतःची मिळवू न शकणारा आणि चार कार्यकर्ते नसणारा श्रीकांत देशमुख हा जिल्हाध्यक्षपद मिळाल्यानंतर जॅकेट घालून स्वतःला प्रतिमोदी समजू लागले आहेत. राजकारणामध्ये पातळी ठेवून सर्वांनी वागले पाहिजे. मात्र, देशमुख यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न हा नालायकपणातून केला आहे. याला सांगोला शिवसेना उत्तर देणार आहे. – शहाजी पाटील, आमदार, सांगोला
भाजपचे आंदोलन लोकशाही पद्धतीने
भाजपने लोकशाही पद्धतीने आंदोलन केले आहे. भाजप जिल्हाध्यक्ष देशमुख यांना फोनवरून बोलण्यासंदर्भात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बरडे यांच्याशी चर्चा झाली आहे. अनुचित प्रकार होणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. – विजयकुमार देशमुख, आमदार